Feeds:
Posts
Comments

मला ‘अनुवाद’ ह्या लेखनप्रकारात रस असल्याने मी जास्त करून अनुवादित पुस्तके विकत घेते. त्यातही वेगवेगळ्या अनुवादकांचे अनुवाद वाचून त्यांची शैली, अनुवादाकडे पाहण्याचा दृष्टीकोन यांचा अभ्यास करायला मला आवडते. अशाच एका पुस्तक प्रदर्शनात डॉ. सुनीती अशोक देशपांडे यांचा ‘कथांतर’ नावाचा अनुवादित कथांचा संग्रह माझ्या नजरेस पडला. इतर सर्व पुस्तकांत उठून दिसत होते, ते त्याचे वैशिष्ट्यपूर्ण मुखपृष्ठ आणि त्याच्या जोडीला त्याचे शीर्षक! अनुवाद म्हणजे काय, याबद्दलचा अनुवादिकेचा अवघा दृष्टीकोन त्या शीर्षकात प्रतिबिंबित झाला होता व मुखपृष्ठावरल्या चित्राने त्याचा अर्थ अधिक स्पष्ट केला होता.

मुखपृष्ठcoverpage

हे ते मुखपृष्ठ. सर्वप्रथम त्यावर कोणकोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया. पार्श्वभूमीचा गडद हिरवा रंग, त्यावर उठून दिसणारी एकाखाली दुसरे अशा प्रकारे मांडलेली दोन पाने, त्यांपैकी एक पिंपळपान असून दुसरे नक्की कसले आहे असा प्रश्न पडायला लावणार्‍या आकाराचे पान, या दोहोंच्या मध्यावर ‘रशियन कथांचा भावानुवाद’ हे उपशीर्षक, त्याखाली ‘कथांतर’ हे शीर्षक, सर्वांत खाली ‘भावानुवाद’ असे लिहून त्याखाली अनुवादिकेचे नाव प्रत्येक अक्षरानंतर थोडी जागा सोडून लिहिलेले आहे.

सर्वप्रथम आपण शीर्षकाचा अर्थ पाहू, म्हणजे त्यानुसार त्या दोन पानांचे रूपक समजायला सोपे जाईल. ‘कथांतर’ हा एक सामासिक शब्द आहे. देशांतर, भाषांतर, गत्यंतर, वेषांतर अशा शब्दांच्या चालीवर या शब्दाची निर्मिती केली गेली आहे. देशांतर म्हणजे दुसरा देश, भाषांतर म्हणजे दुसरी भाषा, गत्यंतर म्हणजे दुसरी गती (मार्ग) आणि वेषांतर म्हणजे दुसरा वेष तसेच हे कथांतर म्हणजे दुसरी कथा. इथे एक लक्षात घ्यायला हवे, की संपूर्ण मुखपृष्ठावर कोठेही ‘भाषांतर’ हा शब्द येत नाही, त्याजागी ‘भाव-अनुवाद’ हा शब्द वापरलेला आहे. ‘भावानुवाद’ या शब्दाचे महत्त्व आपण नंतर पाहू. पण भाषांतर हा शब्द न वापरता कथांतर हा शब्द वापरण्यामागे लेखिकेचा एक अत्यंत महत्त्वाचा विचार दिसून येतो.

भाषांतर या शब्दाचा विग्रह ‘दुसरी भाषा’ आहे, हे आपण पाहिले. म्हणजेच एका भाषेतली एक साहित्यकृती घेऊन तीच दुसर्‍या भाषेत आणणे असा त्याचा अर्थ आहे. जणू काही ती कथा ही एखादी स्वतंत्र वस्तू असून तिच्यावर एका विशिष्ट भाषेचे वेष्टण घातले आहे आणि ते काढून दुसर्‍या भाषेचे वेष्टण तिला चढवले आहे! यातून एक कथा व ती ज्या भाषेत लिहीली आहे ती भाषा या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत व भाषा बदलल्याने आतली कथा तीच, तशीच राहते असे काहीसे सुचवले जाते.

पण प्रत्यक्षात तसे होत नाही!

कथा आणि तिची भाषा या गोष्टी एकच आहेत असे वाटण्याइतपत एकमेकांत गुंतलेल्या असतात. या दोन्ही गोष्टींचा एकमेकांवर सतत प्रभाव पडत असतो व त्यातूनच ती कलाकृती जन्माला येते. हे प्रकर्षाने कुठे जाणवत असेल, तर भाषिक विनोदप्रधान लेखनात. पुलंच्या लेखनातली कोणतीही शाब्दिक कोटी घ्या, ती कोटी शक्य होण्यामागे मराठी भाषेत काही शब्दांचा केला जाणारा विशिष्ट वापर आहे. तीच कोटी आपल्याला इतर भाषांत करता येणे जवळ जवळ अशक्य आहे. आणखी वेगळ्या प्रकारचे उदाहरण घ्यायचे झाल्यास आपण एका भारतीय आदिवासी जमातीच्या कुरुक या भाषेचे उदाहरण घेऊया. मराठीत ‘दिवसाचा मध्य’ या अर्थाने वापरल्या जाणार्‍या ‘मध्याह्न’ या शब्दासाठी कुरुक भाषेत ‘जेव्हा आपली सावली आपल्या पायाखाली येते तेव्हा’ अशा अर्थाचा शब्दाचा आहे. इथे या दोन्ही शब्दांचा अंतीम अर्थ ‘दुपारी १२ वाजताची वेळ’ असाच असला, तरी दोन्ही शब्दांत बराच फरक आहे. अशावेळी ‘आपली सावली आपल्या पायाखाली येईल तेव्हा मी सावलीवर चालत तुला भेटायला येईन’ अशा अर्थाच्या कुरुक वाक्याचे मराठीत भाषांतर करताना जर मी ‘जेव्हा मध्याह्न होईल, तेव्हा मी सावलीवर चालत तुला भेटायला येईन’ असे केले तर मूळ वाक्यातली काव्यात्मकता निघून जाईल, शिवाय मध्याह्न आणि सावली पायाखाली येणे यातला संबंध लगेच लक्षात येणार नाही. आपल्याकडे सावली पायाखाली येईल असा वाक्प्रचार नसला तरी त्याच्याशी थोडेसे साधर्म्य दाखवणारा ‘उन्हे डोक्यावर येणे’ हा वाक्प्रचार आहे. त्यामुळे जर मी ‘जेव्हा उन्हे डोक्यावर येतील तेव्हा मी सावलीवरून चालत तुला भेटायला येईन’ असे मराठी भाषांतर केले, तर त्यातून उन्हे डोक्यावर येण्याचा व सावलीवरून चालण्याचा संबंध तर प्रस्थापित होईलच, शिवाय ते वाक्य अधिक प्रवाही, अधिक सहज, थोडेसे काव्यात्म आणि अधिक ‘मराठी’ वाटेल. पण मूळ कुरुक वाक्यापेक्षा या वाक्याच्या स्वरूपात बराच फरक पडलेला असेल.

म्हणजेच एखादी कथा जेव्हा आपण एका भाषेपासून बाजूला काढतो, तेव्हा त्या भाषेचे तिला चिकटलेले विशेष विलग होतात, निघून जातात. व तीच कथा जेव्हा आपण दुसर्‍या भाषेत नेतो, तेव्हा त्या दुसर्‍या भाषेचे वेगळे विशेष त्या कथेला येऊन चिकटतात. त्या कथेचे स्वरूप बदलते. ती कथा ‘ती’च राहत नाही, एक वेगळी कथा निर्माण होते. म्हणूनच अनुवादिका या सगळ्या प्रक्रियेला भाषांतर न म्हणता, कथांतर म्हणते. ही प्रक्रिया केवळ भाषा बदलण्याची नाही, तर एका कथेतून दुसरी कथा जन्माला घालण्याची आहे.

अशाप्रकारे या शीर्षकाचा अर्थ, महत्त्व कळल्यावर आता चित्राकडे वळू. मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन पाने एकाखाली दुसरे अशाप्रकारे मांडली आहेत. वरच्या पानाचा रंग पोपटी असून, त्यावरचे शिरांचे जाळे, त्यांचा देठाकडे पिवळा होत गेलेला रंग हे सगळे स्पष्ट दिसते आहे. ते पान जिवंत वाटते आहे. खालच्या पानावरचे शिरांचे वगैरे तपशील दिसत नाही आहेत व त्याचा रंगही गडद हिरवा आहे. जणू काही खालचे पान ही वरच्या पानाची सावली आहे. पण सावलीचा आकार मूळ वस्तूसारखाच असतो. इथे तर दोन्ही पानांचे आकार वेगवेगळे आहेत. या सर्वांचा अर्थ काय?

वरच्या पानाचा आकार आपल्या ओळखीचा नाही. मधेच पपईच्या पानासारखे वाटते खरे, पण ते पपईच्या पानाइतके पसरट नाही. शेवटी वरचे पान ज्या झाडाचे आहे, ते झाड आपल्याइथे उगवत नाही, आपल्या ओळखीचे नाही, या निष्कर्षाप्रत आपण पोहोचतो. खालच्या पानाचा आकार मात्र आपल्या ओळखीचा आहे. ते पिंपळाचे पान आहे हे आपल्याला लगेच ओळखता येते. ते ओळखताच इतर अनेक संदर्भ आपल्या मनात गर्दी करतात. जसे, पिंपळाच्या पानाला आपल्याकडे धार्मिक महत्त्व आहे. आपण लहानपणी ते पान एका पुस्तकात जपून ठेवतो व नंतर त्याची जाळी होते. त्यामुळे मराठी साहित्यात पिंपळपान या शब्दाला स्मृतीचा आशय प्राप्त झाला आहे. हे सगळे संदर्भ त्या पानाच्या निव्वळ आकारावरूनच आपल्या लक्षात येतात. त्यासाठी त्या पानाचा खरा रंग, शिरांचे तपशील यांची गरज भासत नाही.

इथे ही दोन्ही पांने व त्यांच्यातला परस्परसंबंध हे एक रुपक आहे. वरचे पान म्हणजे मूळ रशियन कथा, तर खालचे पान म्हणजे अनुवादित कथा. मूळ रशियन कथा शब्दालंकार, रशियन भाषेचा लहेजा, नजाकत, मूळ लेखकाची शैली या सर्वांनी अलंकृत झालेल्या आहेत. पण हे सगळे जास्तीचे तपशील आहेत. शिवाय अनुवाद करताना भाषा बदलल्याने हे तपशील अनुवादित कथेत येत नाहीत. पण कथेचा आत्मा असतो, तो त्यातल्या कथासूत्रात, त्यातल्या भावार्थात. तो मात्र अनुवादित कथेत अधिक स्पष्ट झालेला दिसतो. त्यामुळेच खालच्या पानात तपशील नसले, तरी वरच्या पानातला हिरवा रंग त्यात उतरला आहे पण त्याची छटा अधिकच गडद झाली आहे. म्हणूनच लेखिका या अनुवादित कथांना ‘भाषांतर’ न म्हणता ‘भाव-अनुवाद’ असे म्हणते.

मूळ रशियन भाषा आपल्या ओळखीची नसल्याने आपल्याला या कथांचा आस्वाद घेता येत नाही आहे. त्या आपल्यासाठी अनोळखी, परक्या आहेत. जसा वरच्या पानाचा आकार आपल्यासाठी अनोळखी आहे. पण तीच कथा अनुवादित करताना तिचे स्वरूप बदलले आहे, ती आपल्या ओळखीच्या भाषेत, ओळखीच्या आकारात आलेली आहे. त्यामुळे आता आपल्याला या अनुवादित कथेचा आस्वाद घेणे शक्य झाले आहे.

पण ही कथा आता ‘ती’च राहिलेली नाही, ती वेगळी झाली आहे, तिचे ‘कथांतर’ झाले आहे!

असे असूनही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. अनुवादित कथा ही मूळ कथेची ‘सावली’ आहे. मूळ कथेशिवाय स्वतंत्र अस्तित्व तिला नाही. मूळ कथेपेक्षा कितीही वेगळी झाली असली, तरी तिच्या अस्तित्वाचा आधार ती मूळ कथाच आहे.

इतका सुंदर अर्थ शीर्षकातून मांडणार्‍या डॉ. सुनीती अशोक देशपांडे आणि त्याला इतक्या सुंदर रूपकात्मक चित्राची जोड देणारे चंद्रमोहन कुलकर्णी या दोघांनी मिळून एक सुंदर मुखपृष्ठ निर्माण केले आहे यात मला तरी शंका नाही.

मी या नाटकाकडे पाहते ती नाटककाराची कलाकृती या दृष्टीकोनातून. त्यामुळे वासवदत्ता, उदयन, पद्मावती या पात्रांइतकेच भासाने नाट्यरचनेसाठी वापरलेले devices देखिल मला फार आवडतात.

नाट्याचे १० वेगवेगळे प्रकार आहेत, पैकी एक नाटक. त्यात नायक व नायिका राजघराण्यातले असणे आवश्यक असते. त्यामुळे संस्कृतात भरजरी नाटकांची रेलचेल आहे. स्वप्नवासवदत्तमलाही त्याच नाटकांच्या यादीत बसवणे थोडे अन्यायकारक होईल असे मला तरी वाटते. केवळ नाटकाला राजेशाही दिमाख यावा म्हणून यातली मुख्य पात्रे राजघराण्यातली नाहीत. एक तर हे नाटक ज्या लोककथेवर आधारित आहे, त्यात ही सर्व पात्रे राजकुलीन आहेत. परंतू त्या मूळ लोककथेतील बऱ्याच गोष्टी बदलून घेणाऱ्या भासाला उदयन व वासवदत्ता एक ब्राह्मण व ब्राह्मणी म्हणून सुद्धा दाखवता आले असते. पण या सर्व नाट्याला कारणीभूत ठरलेली राजकीय पार्श्वभूमी या नाटकात फारच महत्त्वाची आहे. हे नाट्य सुरू व्हायला ही राजकीय पार्श्वभूमी कारणीभूत आहे व नाट्य संपायलाही! त्यामुळेच सर्व पात्रे राजघराण्यातली असणे आवश्यक आहे.

त्यांच्या या राजेशाही पार्श्वभूमीतले नाट्यनिर्मितीचे बीज ओळखून भासाने त्याचा चांगलाच उपयोग करून घेतला आहे. माझे स्वत:चे असे मत आहे, की सर्व राजपुत्र व राजकन्यांना लहाणपणापासूनच ‘आपलं जीवन हे प्रजेसाठी आहे’ या विचाराचं बाळकडू देण्यात येत असावं. या एकाच विचाराने राजांना पूर्वी इंद्रियदमन वगैरे करायला शिकवले जात असावे. अर्थातच सर्व राजे/ राण्या या तत्त्वाचे पालन करत असतीलच असे माझे म्हणणे नाही. परंतू वासवदत्ता या तत्त्वाचे पालन करणाऱ्यांपैकी असावी, म्हणूनच तर तिने सर्व धोके, जोखीम स्वीकारून यौगंधरायणाला साथ द्यायचा निर्णय घेतला. जर तिला हे प्रजेचे व राजाच्या कर्तव्याचे महत्त्व पटले नसते तर तिने एवढा मोठा निर्णय निश्चितच घेतला नसता.

तिच्या या पार्श्वभूमीचा उपयोग भासाने पहिल्या अंकातल्या पहिल्या प्रसंगातही करून घेतला आहे. पद्मावतीच्या नोकरांचं वागणं तिला अपमानास्पद वाटलं ते ती एक राजकन्या असल्यामुळेच!

पहिल्या अंकातला ब्रह्मचाऱ्याचा प्रवेश, दुसऱ्या व तिसऱ्या अंकातले मुख्य घटना पडद्याआड ठेवून केवळ वासवदत्तेच्या प्रतिक्रिया पडद्यावर दाखवण्याचे तंत्र, चौथ्या अंकातले द्विकेंद्री दृश्य व त्याहून महत्त्वाची दोन केंद्रांना जोडणारी ती बगळ्यांची माळ, पाचव्या अंकातली वातावरणनिर्मिती व त्यानंतरचा स्वप्नप्रसंग, सहाव्या अंकातली चित्रे, घोषवती वीणा या सर्वच क्लृप्त्या अत्यंत नावीन्यपूर्ण, नाट्यपूर्ण, सहज व म्हणूनच सुंदर आहेत.

स्वप्नप्रसंगामध्ये कितीतरी symbolic गोष्टी दडलेल्या आहेत. उदयन व वासवदत्ता २ वेगवेगळ्या विश्वांत आहेत. उदयन स्वप्ननगरीत तर वासवदत्ता वास्तवात. या दोन विश्वांना जोडणारा त्यांचा संवाद. तसं बघायला गेलं तर उदयन जागेपणीही खोट्या विश्वातच आहे की! तो जिला मृत समजतो आहे ती त्याची वासवदत्ता तर जिवंत आहे. आणि इथे वासवदत्ता मात्र वास्तवाचे खरे चटके झेलते आहे.

उदयन मला आवडतो तो २ गोष्टींमुळे- एक तर त्याचा स्वभाव व त्याने चौथ्या अंकात भुंग्यांना दाखवलेली सह-अनुभूती यांमुळे. संस्कृत नाट्यशास्त्रात नायकाचे ४ प्रकार सांगितले आहेत- धीरोदात्त, धीरललित, धीरोद्धत व धीरशांत. उदयन हा धीरललित नायक आहे. म्हणजेच वीणावादन वगैरे ललितकलांत प्रविण. कला म्हटलं की भावनाप्रधानता आलीच. उदयनही अत्यंत भावनाप्रधान आहे- अगदी प्रेमापुढे आपली कर्तव्ये ओवाळून टाकण्याइतका! टोकाचा प्रेमवेडा असला तरीही त्याचे एक एक संवाद वाचल्यावर उदयनाला सगळं माफ!

उदयन आणि वासवदत्ता यांचं दु:ख एकच- विरहाचं! पण दोघांच्या दु:खाचा पोत किती वेगवेगळा! उदयनाचं दु:ख अज्ञानजनित आहे. विरहाचा स्वीकार करण्यावाचून त्याला काहीच पर्याय नाही व त्यामुळे आपल्या नशीबाला दोष द्यायला तो मोकळा आहे. वासवदत्तेचं मात्र तसं नाही. तिला आपल्या खऱ्या स्वरूपात प्रकट होण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण राजकीय कारणांमुळे व पतीवरील प्रेमामुळेच तिने स्वत: विरहाचा पर्याय निवडला आहे. सुख समोर असूनही ते डावलून दु:खाला स्वीकारणं हा वासवदत्तेच्या भूमिकेचा गाभा आहे. म्हणूनच ती बॉलिवूडपटांतील नायिकांप्रमाणे कितीही मुळूमुळू रडली, तरी ती त्या इतर नायिकांप्रमाणे कणाहीन नक्कीच नाही. ती त्या सर्वांहून वेगळी आहे.

भासाला वासवदत्तेचं पात्र किती वेगवेगळ्या रंगांनी रंगवता आलं असतं! विरहयातना असह्य होऊन व मुख्य म्हणजे सवत स्वीकारायला लागू नये म्हणून खऱ्या रुपात प्रकट होणारी, भावनेच्या आहारी जाणारी वासवदत्ता तो उभी करू शकला असता. किंवा भावनांपुढे कर्तव्याला टोकाचं महत्त्व देऊन emotionally cold झालेली वासवदत्ता तो दाखवू शकला असता. पण भासाच्या वासवदत्तेत आवेग आणि संयम यांचं एक सुंदर मिश्रण आहे. ती भावनिक आहे, पण तरीही तिला कर्तव्याची जाणीव आहे. ती आवेगी आहे, त्या नादात ती नको ते बोलूनही जाते पण लगेच स्वत:ला बांध घालण्याइतकी संयतही आहे. उदयन एकांतात दिसल्यावर त्याच्याशी बोलण्याची इच्छा तिला अनावर होते, पण लगेच भानावर येऊन ती बोलणं थांबवतेदेखिल. तिच्या या वरकरणी परस्परविरोधी स्वभाववैशिष्ट्यांमुळेच ती मला आवडते. ती खऱ्या अर्थाने माणूस आहे. तिच्यात सतत एक द्वंद्व चाललेलं आहे- ‘श्रेयस’ व ‘प्रेयस’ यांच्यामधलं! तिचा निर्णय हे उसनं अवसान नाही. त्याला एक वैचारिक बैठक आहे.

तिचा पद्मावतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र मला कोड्यात पाडतो. सवतीवरही इतकं प्रेम? अगदी एकदासुद्धा तिच्याबद्दल मत्सर, राग, द्वेष नाही वाटत? पण वासवदत्ता अशी आहे, म्हणूनच आवडते ना!

पद्मावतीतही भावनेचा ओलावा व संयम हे दोन्ही असले तरी ती वासवदत्तेहून खूप वेगळी आहे. कारण तिच्यात संयमाचे प्राबल्य आहे. शिवाय उदयनाचे आपल्यावर प्रेम नाही हे तिला कळलेलं असल्याने पद्मावती ही एक अत्यंत वेगळी व्यक्ती बनली आहे. तिला प्रेमाची आस आहे. तिचं स्वत:चं उदयनावर खूप प्रेम आहे. पण त्याच्याकडून प्रेमाची अपेक्षा करता येणार नाही हेही तिला माहित आहे, ते तिला मान्य आहे. त्यामुळे ती काहीशी एका बाजूला पडली आहे, किंबहुना स्वत:च प्रकाशझोतापासून थोडी दूर सरकली आहे.

यौंगधरायण तर या नाटकाचा खरा सूत्रधार. पहिल्या अंकात सर्व पात्रांचे दोर आपल्या हाती गोळा करून जो जातो तो थेट शेवटच्या अंकात उगवतो- दोर ज्याच्या त्याच्या हाती सोपवायला. हे सगळं नाट्य घडवतो व संपवतो तो हा यौगंधरायण. पण बुद्धिबळासारखा प्याद्यांना आपल्या तालावर नाचवणारा नाही. इतर पात्रांच्या मनस्थितीचा विचार करून त्याचा उपयोग करून घेत व तरीही त्यांना त्रास होणार नाही याची शक्य तितकी काळजी घेत तो एक एक चाली खेळतो, तेही आपल्या स्वार्थासाठी नाहीच.

अशी सुंदर पात्रं, असं सुंदर कथानक आणि असे सुंदर प्रसंग एकत्र आणणं तो एक भासच करू जाणे!

हे नाटक ज्यांना वाचायचं असेल त्यांना ते हिंदी भाषांतर व संस्कृत टीकेसहित http://www.vedamu.org/home.asp येथे वाचता येईल. skip intro -> learn sanskrit -> kaavyas-> svapnavasavadattam या मार्गाने जावे.

Recap-

पद्मावतीला डोकेदुखीचा त्रास होत असल्याचं वृत्त समजताच उदयन आणि वासवदत्ता तिला भेटायला जातात. पद्मावती तिथे नसतेच व उदयन वासवदत्तेची भेट होते, पण एका वेगळ्याच प्रकारे- उदयन झोपी जातो व स्वप्नातल्या वासवदत्तेला प्रश्न विचारतो तेव्हा प्रत्यक्षातली वासवदत्ता त्याच्या समोर उभी राहून त्याला उत्तरं देते. निघताना त्याच्या हाताला स्पर्श करण्याचं निमित्त होतं व अर्धवट जागा झालेल्या उदयनाला वासवदत्ता जिवंत असल्याची खात्री पटते. इतक्यात उदयनाच्या शत्रुचा नायनाट होऊन उदयनाचे सर्व राज्य परत मिळाल्याची बातमी घेऊन कांचुकीय येतो. आता पुढे-

अंक सहावा-

यौगंधरायाच्या योजनेचा हेतू सफल झाल्यावर आता वासवदत्तेने आणखी काही काळ अज्ञातवासात राहण्यास काहीच प्रयोजन उरत नाही. सहाव्या अंकात उदयन-वासवदत्तेची पुनर्भेट भासाने रंगवली आहे.

राज्य परत मिळाल्यावर उदयनाने पद्मावतीसोबत आपला मुक्काम सासुरवाडीहून आपल्या स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या महालात हलवला आहे. एक दिवस असंच महालातून फिरत असताना उदयनाच्या कानी वीणेचे सूर पडतात. ते सूर त्याच्या ‘घोषवती’ नामक वीणेचे असल्याचे ते लगेच ओळखतो. मग ती वीणा वाजवणाऱ्या माणसाला पाचारण करून ‘ही तुला कुठे मिळाली?’ वगैरे विचारण्यात येते. ती वीणा खरोखरीच ‘घोषवती’ असल्याचे सिद्ध होते. उदयनाला आपल्या पहिल्या प्रेमाची साक्षीदार अशी ती वीणा परत मिळाल्यावर आनंद तर होतोच परंतू त्यापाठोपाठ वासवदत्तेची आठवण होऊन त्याचा जीव कासावीस होतो. ‘घोषवती तर मिळाली, पण घोषवती जिची लाडकी होती, ती काही दृष्टीस पडत नाही’ असे म्हणून तो शोक करू लागतो.

इतक्यात वासवदत्तेच्या माहेराहून त्यांचा कांचुकीय वासवदत्तेची दाई- वसुंधरा हिच्यासोबत उदयनाला भेटायला येतो. तेव्हा पद्मावतीही ‘वासवदत्तेचे नातेवाईक ते माझे नातेवाईक’ असे म्हणत उदयनासोबत कांचुकीय व वसुंधरेला सामोरी जाते. उदयनाच्या मनाला मात्र एका वेगळ्याच भीतीने घेरलेले असते. तो पद्मावतीला म्हणतो- “त्यांच्या कन्येचे मी हरण केले, परंतू तिचे रक्षण मात्र करू शकलो नाही! आता ते काय म्हणतील बरे!”

परंतू कांचुकीयाच्या बोलण्यावरून महासेन (वासवदत्तेचे वडिल) उदयनावर चिडलेले नसल्याचे लक्षात येते. तो प्रथम राज्य परत मिळवल्याबद्दल उदयनाचं अभिनंदन करतो. पुढे वसुंधरा त्याला वासवदत्तेच्या आईचा- राणी अंगारवतीचा निरोप सांगते- “महासेन महाराजांना सुरुवातीपासूनच तुम्ही जावई म्हणून पसंत होतात, म्हणूनच खोट्या हत्तीचा बनाव रचून तुम्हाला आमच्या महाली आणले व वीणा शिकवण्याच्या निमित्ताने तुमची व वासवदत्तेची भेट घडवून आणली. तुम्हा दोघांचं लग्न लावण्याचा विचार सुरू असतानाच, तुमच्या उतावीळ स्वभावाला अनुसरून तुम्ही दोघं पळून गेलात. म्हणून त्यानंतर तुम्हा दोघांची हुबेहुब चित्रे बनवून घेऊन विवाहविधी उरकला. आता ती चित्रे तुम्हाला भेट देण्यासाठी आणली आहेत.”

वासवदत्ता दिसायला होती तरी कशी या कुतूहलाने पद्मावती तिचे चित्र पाहते. ते चित्र पाहून तिला आपली प्रोषितभर्तृका सखी आठवते. चित्रे खरेच हुबेहुब आहेत का हे पहायला ती उदयनाचे चित्र पाहते. चित्रे हुबेहुब असल्याची खात्री झाल्यावर ती उदयनाला आपल्या सखीबद्दल सांगते. परंतू ती स्त्री एका ब्राह्मणाची बहिण असल्याचे पद्मावतीकडून समजल्यावर उदयनाची आशा मावळते. या जगात एकसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती असतात असे म्हणून तो स्वत:ची समजूत घालतो.

इतक्यात प्रतिहारी (म्हणजे दारावर उभी असणारी स्त्री संरक्षक) येते व दाराशी एक ब्राह्मण पद्मावतीकडे ठेव म्हणून सांभाळायला दिलेल्या आपल्या बहिणीला न्यायला आला आहे असे सांगते. तो ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणवेषातला यौंगधरायण काहीसा बिचकतच प्रवेश करतो. ‘मी एवढा कट केला खरा, आणि त्याला यश आलं हेही खरं पण आता उदयन महाराज मला काय म्हणतील?’ अशी चिंता त्याच्या मनाला लागून राहिलेली असते.

ब्राह्मणवेषातल्या यौंगधरायणाला उदयन पटकन ओळखत नाही, पण त्याचा आवाज मात्र ओळखीचा वाटतो. मग वासवदत्तेला बोलावलं जातं. हा ठेव परत करण्याचा व्यवहार साक्षीदारांच्या समक्ष करावा असा उदयनाचा आग्रह असतो. परंतू ठेव म्हणजे एक अवगुंठनातली स्त्री असल्याने व परस्त्रीकडे पाहू नये असा संकेत असल्याने तो वसुंधरेला साक्षीदाराचं काम करायला सांगतो. तेव्हा नीट पाहिल्यावर वसुंधरा वासवदत्तेला ओळखते.

लगेच यौगंधरायण आणि वासवदत्ता ‘महाराजांचा जयजयकार असो!’ असं म्हणत आपलं खरं रूप प्रकट करतात, यौगंधरायण राजाला नेमके काय व कसे झाले ते समजावून सांगतो. पद्मावती वा वासवदत्ता यांच्या मनात एकमेकींबद्दल प्रचंड आदर व प्रेम असल्याने त्या सवत म्हणून एकमेकींचा स्वीकार करतात.

आणि शेवटी भरतवाक्याने नाटकाचा शेवट होतो.

Recap-

उदयनाचं पद्मावतीशी लग्न झाल्यानंतर चौथा अंक सुरू होतो. पद्मावती वासवदत्ता व एका दासीसोबत फिरायला गेली असता उदयन वसंतकासोबत त्याच उद्यानात येतो. पण त्या तिघी त्या दोघांच्या नजरेस पडत नाहीत. त्या दोघांच्या गप्पांतून उदयनाला पद्मावतीविषयी आपुलकी जरी वाटत असली, तरीही त्याचं मन अजूनही वासवदत्तेतच अडकून राहिलं आहे, हे वासवदत्तेला कळतं व ती खूश होते. आता पुढे-

अंक पाचवा-

उदयनाने वासवदत्तेवरच्या आपल्या प्रेमाची कबुली दिल्याने पद्मावतीला झालेलं दु:ख तिने चेहऱ्यावर किंवा बोलण्या-वागण्यातून दाखवलं नसलं तरी ते खचितच तीव्र असणार. त्याचाच परिणाम म्हणून की काय तिला डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो. तिला बरं वाटावं म्हणून सगळ्यांची धावपळ सुरू होते. डोकेदुखी थांबवण्यासाठी लेप आणणं, वासवदत्ता ही पद्मावतीची प्रिय सखी म्हणून तिला व उदयन हा पद्मावतीचा पती म्हणून त्याला पद्मावतीच्या या आजाराबद्दल कळवणं यासाठी दासी धावपळ करू लागतात. दासी उदयन व वासवदत्तेला पद्मावती समुद्रगृहात आराम करत असल्याचं सांगतात. समुद्रगृह हे एक असं दालन असतं जे एखाद्या सरोवराच्या मधोमध बांधलं जातं. जेणेकरून तिथलं वातावरण शीतल राहिल. उन्हाळ्यात किंवा आजारी असताना राजपुरुष व स्त्रीया या दालनात राहत असावेत.

उदयन वसंतकाला घेऊन तडक समुद्रगृहाकडे निघातो. उदयनाला पद्मावतीची काळजी वाटते आहे. आपली प्रिय वासवदत्ता तर दैवाने आपल्याकडून हिरावून नेलेली आहेच, आता पद्मावतीला का बरं दैव त्रास देत आहे? असा विचार तो करतो आहे. समुद्रगृहात शिरताच वसंतक बोंबा ठोकू लागतो- ‘साप, साप’. प्रत्यक्षात ती केवळ एक दोरी असते पण अंधूक प्रकाशामुळे ती वसंतकाला सापासारखी वाटते. गैरसमज दूर झाल्यावर दोघे आत जातात व पाहतात तो काय, पद्मावती तिथे नसतेच. म्हणून ते दोघे तिथेच बसून तिची वाट पाहू लागतात. वेळ घालवण्यासाठी वसंतक उदयनाला एक गोष्ट सांगू लागतो पण तेवढ्यात राजा पलंगावर आडवा होतो आणि बघता बघता झोपीही जातो. तिथल्या थंड वाऱ्यांचा त्याला त्रास होऊ नये म्हणून वसंतक त्याच्यासाठी शाल आणायला जातो. इथे भासाने प्रसंगाची बांधणी खूपच छान केली आहे. सगळ्या दासदास्या पद्मावतीची काळजी घेण्यात गुंतल्या आहेत. पद्मावती समुद्रगृहात नसून तिसरीकडेच आहे. वसंतक महालात गेला आहे. म्हणजे आता समुद्रगृहात उदयन काही काळापर्यंत एकटाच असणार आहे.

आणि इतक्यात वासवदत्ता धावत धावत तिथे येते. तिच्याही मनात उदयनासारखेच विचार चाललेले असतात. येऊन पाहते तो पलंगावर कुणीतरी झोपलेलं असतं. अंधुक प्रकाशात कोण आहे ते नीटसं कळत नाही. पण ती पद्मावतीच असणार अशी समजूत वासवदत्ता करून घेते. जवळ जाऊन श्वासोच्छवास नीट चालला आहे का ते पाहते. नीट चालल्याचे कळताच तिला हायसं वाटतं. मग ती विचार करते- ‘पलंगाची अर्धी बाजू मोकळी सोडलेली आहे. म्हणजे पद्मावतीला मी तिच्या शेजारी बसून रहायला हवी असेन.’ म्हणून ती बाजूला बसते. पण बसल्याक्षणीच तिला एक वेगळीच संवेदना जाणवते. ही संवेदना कसली याचा विचार ती करत असते तोच- ‘अगं वासवदत्ते!’ असा उदयनाचा आवाज येतो.

वासवदत्तेबरोबर आपल्यालाही भीती वाटते, वासवदत्तेचं बिंग फुटलं, उदयनाने तिला ओळखलं. पण नाही उदयन स्वप्नात असतो. त्या स्वप्नात त्याला वासवदत्ता भेटलेली असते. हे पाहून वासवदत्तेला हायसं वाटतं पण लगेच मनात चलबिचल सुरू होते. इथेच थांबून त्यांना डोळेभरून पाहून घ्यावं की कुणी यायच्या आत इथून निघून जावं? मोहाचा विजय होतो. वासवदत्ता तिथेच थांबते.

उदयन स्वप्नात पुन्हा बडबडू लागतो. ‘अगं प्रिये, प्रत्युत्तर तरी दे.’

वासवदत्ता- बोलते आहे, नाथ, मी बोलते आहे!

उदयन- हे काय, माझ्यावर रागावली आहेस?

इथे भासाने एक छोटीशी मजा केली आहे. प्रोषितभर्तृकांनी साजशृंगार करू नये, केशभूषा करू नये असा संकेत आहे. त्यामुळे वासवदत्ताही साध्या वेषात, केस मोकळे सोडून सगळीकडे वावरत होती. त्या काळी स्त्रिया प्रियकरावर रागावल्यावरही आपला राग सूचित करण्यसाठी असाच साधा वेष धारण करीत. उदयनाच्या स्वप्नातली वासवदत्ताही साध्या वेषातच होती. म्हणून त्याला प्रश्न पडतो, की ही आपल्यावर रागावली आहे की काय!

अशाच त्यांच्या गप्पा काही क्षणांसाठी चालू राहतात. उदयन स्वप्नातल्या वासवदत्तेशी बोलतो आणि वासवदत्ता त्याच्या प्रश्नांना उत्तरे देते. बोलता बोलता उदयन हात वर उचलतो पण झोपेत असल्याने ते खाली पडतात. वासवदत्ता भानावर येते. कुणीतरी येण्याच्या आत निघावं म्हणून उठते. पण विचार करते, ‘एवढा बिछान्यावरून लोंबणारा त्यांचा हात नीट बिछान्यावर ठेऊन निघू’ तसं ती करते. पण त्या स्पर्शाने उदयनाला जाग येते. तो वासवदत्तेचा स्पर्श ओळखतो. वासवदत्ता घाबरून समुद्रगृहातून पळून जाते. उदयन अर्धवट झोपेतच उठून तिचा पाठलाग करू लागतो पण बंद दारावर त्याचं डोकं आपटून तो मागे पडतो आणि वासवदत्ता त्याच्या दृष्टीस पडण्याचा प्रसंग टळतो.

उदयन विचारात पडतो, आपण पाहिलं ते सत्य की स्वप्न? वसंतकाला तो समजावू पाहतो की वासवदत्ता जिवंत आहे. वसंतकाचा त्याच्यावर अर्थातच विश्वास बसत नाही. तेव्हा उदयन म्हणतो, ‘अरे पहा, तिने मला स्पर्श केला तेव्हा माझ्या अंगावर उठलेला रोमांच अजून तसाच आहे.’ पण वसंतकाला काही हे पटत नाही. तो पुन्हा पुन्हा उदयनाला ‘वासवदत्ता मेली आता विसर तू तिला’ असं सांगून त्याची समजून काढू पाहतो. पण उदयनाच्या मनात वासवदत्ता जिवंत असल्याची आशा निर्माण होते, तो नंतर वसंतकाला म्हणतो-

‘यदि तावदयं स्वप्नो धन्यमप्रतिबोधनम।

अथायं विभ्रमो वा स्याद विभ्रमो ह्यस्तु मे चिरम ॥’

म्हणजेच- हे जर खरेच स्वप्न असेल, तर त्यांतून जाग न येण्यांतच धन्यता आहे. आणि जर हा मनाचा भ्रम असेल, तर हाच भ्रम चिरकाळ टिको”

इतक्यात कांचुकीय प्रवेश करतो व उदयनाला एक आनंदाची बातमी सांगतो. दर्शकाच्या सेनेसोबत उदयनाच्या सेनेने उदयनाच्या शत्रूवर जो हल्ला केला होता, त्याला यश आलं आहे. आणि गमावलेलं सगळं राज्य परत उदयनाच्या हाती आलं आहे.

म्हणजेच यौगंधरायणाच्या योजनेचा हेतू सफल झाला आहे.

हा अंक या नाटकातला सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण अंक आहे. या अंकावरूनच तर या नाटकाला नाव देण्यात आलं आहे. याच कारण म्हणजे भासाने स्वप्नदृष्याचा केलेला अभिनव प्रयोग. चौथ्या अंकात उदयनाच्या प्रेमाची साक्ष वासवदत्तेला मिळालेली आहे. या स्वप्नप्रसंगामुळे वासवदत्ता जिवंत असल्याची आशा उदयनाच्या मनात निर्माण होते. अशाप्रकारे त्यांचे मनोमीलन तर होतेच शिवाय अंकाच्या शेवटी आलेल्या बातमीमुळे त्यांच्या प्रत्यक्ष पुनर्मीलनाची सूचनाही आपल्याला मिळते. (तो भाग शेवटच्या अंकात)

खरं म्हणजे भरताच्या नाट्यशास्त्रात स्वप्नप्रसंग रंगमंचावर दाखवू नयेत असा नियम दिला आहे. पण भासाने हा नियम त्याच्या स्वप्नवासवदत्तम व बालचरितम या दोन नाटकांत मोडला आहे. याखेरीज आणखीही काही नियम भास वेळोवेळी मोडतो. शिवाय त्याचे काही व्याकरणाचे प्रयोग आर्ष असल्याने भास हा भरत आणि पाणिनी यांच्या अगोदर होऊन गेल्याचे मानले जाते.

अंक चौथा

Recap- उदयन काही कामानिमित्त मगधदेशी गेला असता राजा दर्शकाने आपली बहिण पद्मावती हिच्यासाठी उदयनाला मागणी घातली. उदयनाने होकार दिला व लगेच त्याच दिवशी त्यांचे लग्न झाले. त्यातच पद्मावतीची विवाहमाला गुंफण्याचं काम वासवदत्तेकडे आल्याने तिच्या दु:खात भरच पडली. इथवर सगळं तसं अपेक्षित मार्गावरूनच चाललं आहे, पण आता सुरू होतात अनपेक्षित वळणं-

अंक चौथा

हा माझा सर्वांत आवडता अंक आहे. यात एक द्विकेंद्री दृश्य आहे. म्हणजे रंगमंचावर एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गटांत वेगवेगळी संभाषणे किंवा नाट्यं चालली आहेत. कसं ते आता आपण पाहुयाच.

पद्मावतीच्या लग्नानंतरचा प्रसंग. ती वासवदत्ता आणि एका दासीबरोबर बागेत फिरायला जाते. तिथे प्राजक्ताची झाडे फुलांनी डवरून आलेली असतात. एका शिळेवर बसून पद्मावती आणि वासवदत्ता त्या फुलांचे सौंदर्य पाहत असतात. तेव्हा पद्मावती दासीला सांगते, ‘थोडीशीच फुलं इकडे आण, बाकी सगळी झाडावरच राहू देत. म्हणजे महाराज (उदयन) इथे आले की त्यांनाही या फुलांची शोभा पहायला मिळेल.’ त्यावर वासवदत्ता तिला विचारते, ‘तुझं तुझ्यावर पतीवर खूप प्रेम दिसतं.’ पद्मावती मात्र ‘माझं प्रेम आहे’ असं स्पष्ट म्हणत नाही, राजकुळातल्या शिष्टाचाराप्रमाणे ‘ते काही माहित नाही बाई, पण ते जवळ नसले की हूरहूर वाटते.’ असे आडून सांगते.

नंतर बोलता बोलता ती एक शंका व्यक्त करते, ‘वासवदत्तेलाही महाराजांबद्दल माझ्याएवढंच प्रेम वाटत असेल का?’ पुन्हा एकदा वासवदत्तेचा मनावरचा ताबा जातो आणि ती भावनावेगात ‘तुझ्याहून जास्तच प्रेम होतं तिचं’ असं म्हणते. मग परत ‘त्याशिवाय का ती घरच्यांना सोडून पळून गेली त्यांच्याबरोबर’ असं काहीतरी बोलून वेळ मारून नेते.

दासीचं मात्र वेगळंच चाललेलं असतं. ती पद्मावतीला म्हणते, ‘तुम्ही महाराजांना वीणा शिकवण्यासाठी गळ घाला’. त्यावर पद्मावती म्हणते, ‘मी तसं विचारलंही होतं. पण ते एक उसासा सोडून गप्प झाले. वासवदत्तेची आठवण येऊन त्यांना वाईट वाटलं असावं.’ हे ऐकून वासवदत्तेला जरा बरं वाटतं. उदयनाने जरी पद्मावतीशी लग्न केलेलं असलं, तरी अजून तिला वासवदत्तेचा दर्जा दिलेला नाही, हेच कळून येतं ना यावरून. पण हे सगळे पद्मावतीच्या मनाचे खेळही असू शकतात. खुद्द उदयनाच्या तोंडून हेच वासवदत्तेला ऐकायला मिळालं तर? भास वासवदत्तेची ही इच्छा पूर्ण करतो.

अशी कल्पना करा की रंगमंचाचे दोन समसमान भाग केले आहेत. एका भागात रंगमंचाच्या मध्याच्या थोडं जवळ एक शिळा आहे व त्यावर बसून पद्मावती व वासवदत्ता बोलत आहेत आणि ती दासीही तिथेच उभी आहे. दुसऱ्या भागात एक लतामंडप उभारला आहे. ज्या भागात त्या तिघी बसल्या आहेत त्या भागाच्या विंगेतून उदयन आणि वसंतक (या नाटकातला विदूषक, उदयनाचा जवळचा मित्र) रंगमंचावर प्रवेश करतात आणि तिथेच थांबतात. मधे काही झुडुपे असल्यामुळे म्हणा किंवा आणखी कशामुळे त्या दोघांना या तिघी दिसत नाहीत. ते दोघे आपापसात बोलतायत.

विदूषक राजाला प्रमदवनाची शोभा दाखवतो आहे, तर इथे उदयनाला वेगळीच काळजी लागून राहिली आहे. तो वसंतकाला म्हणतोय, मी वासवदत्तेला जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मदनाने त्याचे ५ही बाण माझ्यावर सोडून मला पुरतं घायाळ केलं. अजूनही त्याचे घाव तसेच ताजे असताना, एक नवा घाव माझ्या हृदयावर बसला आहे. मदनाकडे केवळ ५ च बाण असताना हा सहावा बाण कुठून आला? थोडक्यात, उदयनाचं पद्मावतीवरचं प्रेम वाढतं आहे. वासवदत्तेवर इतकं जीवापाड प्रेम असताना दुसरी स्त्री आपल्याला कशी काय आवडू शकते, हे कोडं उदयनाला पडलं आहे.

पण विदूषकाचं लक्ष कुठे आहे त्याच्या बोलण्याकडे? तो स्वत:शीच बडबडतोय, ‘कुठे गेली असेल बरं पद्मावती?’ तो सगळ्या बाजूंना वळून ती कुठे दिसतेय का ते पाहू लागतो. त्या तिघींवर नजर जाण्यापूर्वी त्याची दृष्टी आकाशाकडे वळते आणि वरून उडणारी एक बगळ्याची माळ त्याला दिसते. तो लगेच उदयनाला ते सुंदर दृश्य दाखवतो. इतक्यात दासीला सुद्धा ते बगळे दिसतात व ती त्या दोघींना ते दृश्य दाखवते. सर्वजण एकाच ठिकाणी पाहू लागतात. बगळ्यांकडे पाहत असताना दासीची दृष्टी खाली जाते व तिला उदयन व वसंतक दिसतात.

इथे आपल्याला वाटायला लागतं, झालं, आता दासी त्या दोघांना हाक मारणार आणि वासवदत्ता उदयनाला दिसणार आणि त्यांचं बिंग फुटणार. पण तसं होत नाही. पद्मावतीला आठवतं की वासवदत्तेला परपुरुषदर्शन वर्ज्य आहे. त्यामुळे ती वासवदत्ता आणि दासीसोबत लतामंडपात शिरते. त्याच्यावरून वेली सोडल्या असल्यामुळे त्यांच्या आड लपलेल्या त्या तिघी त्या दोघांना दिसणार नाहीत, पण ते दोघं मात्र त्यांना दिसतील, त्यांचं बोलणं ऐकू येईल.

इतक्यात ते दोघं त्याच शिळातलापाशी येतात. तिथे प्राजक्ताची फुले ठेवलेली पाहिल्यावर पद्मावती इथे येऊन गेली असली पाहिजे असा तर्क ते करतात व तिथेच तिची वाट पाहत बसून राहतात. त्यामुळे त्या तिघी मंडपातच अडकून राहतात.

पण सलग ५ मिनिटांत एकही घोळ घातला नाही, तर तो वसंतक कसला? शिळेवर बसतो ना बसतो तोच परत उठून तो उदयनाला म्हणतो, ‘चल रे, इथे फार उन्ह आहे, आपण त्या लतामंडपात जाऊया.’ उदयनालाही मित्रावर फारच प्रेम! तो लगेच मंडपाकडे जायला उठतो. आता आली का पंचाईत! ते दोघे मंडपाजवळ येतात. वसंतक वेली बाजूला सारून आत येणार…… तोच आपली चतुर दासी डोकं लढवते आणि जवळच्या वेली गदागदा हलवते. त्यावर बसलेले भुंग्यांचे थवेच्या थवे त्या दोघांच्या दिशेने उडू लागतात. वसंतक घाबरून मागे हटतो. पण ते भुंगे आहेत हे कळयावर एक दोन शिव्या हासडतो. (संस्कृतात शिव्या आहेत बरं!)

त्यावर त्याला थांबवण्यासाठी उदयन जे काही म्हणतो, तो या नाटकातला माझा सर्वांत आवडता संवाद आहे. तो म्हणतो,’ अरे नको रे त्या भुंग्याना त्रास देऊस. पहा तरी,

मधुमदकला मधुकरा मदनार्ताभि: प्रियाभिरुपगूढा:।

पादन्यासविषण्णा वयमिव कान्तावियुक्ता: स्यु:॥’

म्हणजे, ‘मधाच्या धुंदीत गोड गुणगुणणाऱ्या मधुकरांना त्यांच्या प्रेमविव्हल प्रिया बिलगून बसल्या आहेत. आपल्या पावलांच्या आवाजाने ते बिचकतील आणि आमच्याप्रमाणे त्यांनाही कांतेचा वियोग होईल!’

प्रेमात पडलेल्या माणसाचं हृदय कोमल होतं, असं म्हणतात ते खरं असावं बहुधा!

उदयन आणि वसंतक परत माघारी वळतात पण बागेबाहेर जात नाहीत, त्याच शिळातलावर जाऊन बसतात. हा सगळा प्रसंग चाललेला असताना वासवदत्तेचा वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली अडकला असणार. पण उदयनाच्या नजरेस पडण्याचा हा प्रसंग टळल्यावर तिला हायसं वाटतं, ती उदयनाचं निरीक्षण करते आणि त्याची तब्येत सुधारल्याबद्दल तिला बरं वाटतं. इतक्या दिवसांनी पतीचं दर्शन झालं, दोघा नवरा-बायकोत अंतर जेमतेम काही फुटांचं, तरीही ती त्याला भेटू शकत नाही, या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी येतं. इतर दोघींच्या ते लक्षात आल्यावर भुंग्यांमुळे फुलांतले परागकण उडून डोळ्यात गेले अशी सबब ती सांगते.

मी मगाशीच म्हटलं ना, ५ मिनिटे शांत बसेल तो वसंतक कसला? इकडे तिकडे पाहून आसपास कुणी नाही याची खात्री करून घेऊन तो उदयनाला एक प्रश्न विचारतो,’ तुला कोण आवडते, त्या वेळची राणी वासवदत्ता की सध्याची राणी पद्मावती?’ अर्थातच या प्रश्नाला उत्तर देण्यापूर्वी उदयन खूप आढेवेढे घेतो. कोणत्याही राणीच्या बाजूने बोलला तरी पंचाईत. त्यावर वसंतक म्हणतो, ‘अरे बिन्धास्त सांग रे, त्यातली एक देवाघरी गेली आहे आणि दुसरी आता इथे नाही.’ (हे वाक्य हशात भर पाडतं, कारण त्या दोघी बाजूलाच उभं राहून हे ऐकतायत.) इथे त्या दोघींचा जीव टांगणीला- काय उत्तर देणार उदयन? आतून दोघींनाही उदयनाने आपलं नाव घ्यावंसं वाटतंय पण तो आपलं सोडून दुसरीचंच नाव घेईल अशी भीतीही वाटतेय. उदयन मात्र वसंतकाला सांगितलं आणि ते गुपित त्याच्या पोटात राहिलं नाही तर काय घ्या, म्हणून काहितरी डिप्लोमॅटिक उत्तर शोधतो आहे.

अखेर कुठलाच मार्ग सापडत नाही व वसंतकही माघार घेत नाही हे पाहून उदयन त्याला खरं ते सांगतो. तो म्हणतो, ‘रुप, चारित्र्य, माधुर्य यांमुळे मला पद्मावतीबद्दल अत्यंत आदर आहे. पण वासवदत्तेच्या ठिकाणी गुंतलेलं माझं मन काही ती ओढून नेऊ शकत नाही.’

यावर तिघी त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे प्रतिक्रिया देतात. वासवदत्ता आनंदून जाते. तिच्या सगळ्यां दु:खांचं, कष्टांचं चीज झाल्यासारखं तिला वाटतं. दासी मात्र चिडते, ‘ही काय रीतभात झाली?’ पण पद्मावती तिची समजूत काढते. ती म्हणते, ‘अगं वासवदत्तेला ते विसरलेले नाहीत म्हणजे त्यांचं खरं प्रेम असलं पाहिजे’ असा खरं प्रेम करणारा पती मला मिळाला असं पद्मावतीला अभिप्रेत असतं, पण ते प्रेम तिच्यावर केलेलं नसतं याचं तिला दु:ख वाटत असलं , तरी ती दाखवत नाही.

मग उदयन वसंतकाला तोच प्रश्न विचारतो. वसंतक एक नंबरचा खादाड! तो म्हणतो, ‘वासवदत्तेबद्दल मला आदर आहेच, पण पद्मावती नेहमीच माझ्यासाठी तुपातले पदार्थ बनवते मग सगळीकडे मला शोधत फिरते आणि मी भेटलो, की मोठ्या प्रेमाने मला ते खायला देते. म्हणून मला पद्मावती आवडते.

वासवदत्ता मनातल्या मनात ‘अस्सं काय बच्चमजी!’ म्हणते तर उदयन वासवदत्ता वारल्याचे क्षणभर विसरून ‘थांब आता वासवदत्तेलाच सांगतो’ असं म्हणतो. विदूषक बावळट पुन्हा घोळ घालतो, ‘ वासवदत्ता? कुठे आहे ती? ती तर कधीच मेली’ असं वेड्यासारखं बडबडतो. (तेव्हा तो शिळातल उचलून त्याच्या डोक्यात घालावासा मला वाटतो) ते ऐकून उदयनाला खूप वाईट वाटतं आणि त्याच्या डोळ्यांत पाणी येतं. वासवदत्तेला मात्र पदोपदी असे उदयनाच्या आपल्यावरच्या प्रेमाचे दाखले मिळाल्यामुळे भयंकरच आनंद झालेला असतो, आपल्या प्रियकराने आपण जवळ नाही असं समजून तिसऱ्याकडे आपलं गुणगान करून आपल्यावरच्या प्रेमाची कबुली द्यावी, प्रेयसीसाठी यापरती दुसरी आनंदाची गोष्ट कोणती?

इथे उदयनाला मात्र पुन्हा एकदा दु:खाचा उमाळा आलेला असतो, अश्रुंनी त्याचा चेहरा भिजून जातो म्हणून वसंतक पाणी आणायला जातो तर आपल्याला या अवस्थेत कुणी पाहू नये म्हणून उदयन चेहरा उपरण्याने झाकून घेतो. ही संधी साधून वासवदत्ता आणि दासी तिथून सटकतात, तर पद्मावती आपला पती दु:खात असताना आपण त्याच्याबरोबर असावं असा विचार करून त्याला धीर द्यायला जाते.

इतक्यात वसंतक येतो. त्याने इतके घोळ घातल्यावर पद्मावती त्याला बरी सोडेल! त्याचा रस्ता अडवून काय रे कुठे गेलेलास, हे पाणी कशासाठी असं विचारते. वसंतकाचं ततपप होतं, त्यावर ती ‘न अडखळता बोल’ असं म्हणते. (हा भाग वाचताना पद्मावती हाताची घडी घालून एक पाय जमिनीवर हळूहळू आपटत दरडावून त्याला विचारते आहे असं चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतं) मजा म्हणजे त्यावर वसंतक वासवदत्तेने सांगितलेली परागकणांचीच सबब सांगतो. नंतर ते उदयनालाही जाऊन सांगतो आणि उदयन तेच नाटक करतो. मग तिघे एकत्र दर्शकाला भेटण्यासाठी निघून जातात आणि पडदा पडतो.

प्रतिज्ञायौंगधरायणापासून ज्याची चर्चा चाललेली असते, तो उदयन अखेर या अंकात रंगमंचावर अवतरतो. त्याचा हा प्रवेश त्याची भावनाप्रधानता, संवेदनशीलताच अधोरेखित करतो. या अंकात वासवदत्तेला उदयनाच्या प्रेमाची साक्ष पटली आहे. पण उदयनाच्या हृदयला दिलासा कसा मिळणार? ते पुढच्या अंकात.

Recap :D

आधीच्या भागात लिहीताना फारच गुंतागुंत झाली बहुधा. म्हणुन पहिल्या अंकातलं कथानक अगदी थोडक्या शब्दांत-

राजा उदयन त्याची राणी वासवदत्ता हिच्यावरच्या आत्यंतिक प्रेमापुढे राज्यकारभाराला दुय्यम स्थान देतो व परिणामी बरंचसं राज्य हातातून जातं. उदयनाला प्रेमातून बाहेर काढून राज्यकारभारात पुन्हा लक्ष घालण्यास प्रवृत्त करण्यासाठी त्याचा अमात्य यौगंधरायण स्वत:च्या व वासवदत्तेच्या मृत्युचं नाटक करतो. ते दोघे वेषांतर करून अज्ञातवासात जातात. एका तपोवनात आले असता त्यांना मगधराजकन्या ‘पद्मावती’ भेटते. वासवदत्ता ही स्वत:ची प्रोषितभर्तृका (जिचा नवरा परगावी गेला आहे अशी स्त्री) बहिण असून तिचा सांभाळ करण्याची विनंती यौगंधरायण पद्मावतीला करतो. ती मान्य झाल्यावर वासवदत्ता पद्मावतीच्या सखीपरिवारात सामिल होते.

आता पुढे-

अंक दुसरा

हे दृश्य मगधदेशातलं- राजकुमारी पद्मावतीच्या राजमहालातलं. पद्मावती तिच्या सख्यांसोबत बागेत खेळते आहे. ४ मैत्रिणी एकत्र आल्या की काय होणार? एकमेकींची थट्टा मस्करी! त्यात पद्मावती तर उपवर झालेली. मग काय विचारता, तिच्या खेळण्यावरून, तिच्या कोमल हातांवरून, तिच्या सौंदर्यावरून वासवदत्ता पद्मावतीची थट्टा करते आहे. मस्करीत वासवदत्ता तिला प्रद्योत महासेनाची भावी सून म्हणून हाक मारते. तेव्हा वासवदत्तेला कळतं की पद्मावतीच्या मनात त्या देशाशी सोयरीक जुळवणं नाही. ‘मग कोणता राजा मनात भरला पद्मावतीच्या’ या तिच्या प्रश्नाला मिळालेलं उत्तर धक्कादायक असतं- राजा उदयन! त्याचा संवेदनशील आणि मायाळू स्वभाव पद्मावतीला आवडलेला असतो.

तेव्हा दुसरी एक दासी पद्मावतीला चिडवत म्हणते, ‘पण ताईसाहेब, महाराज उदयन दिसायला बरे नसले तर?’ त्यावर वासवदत्ता पटकन बोलून जाते- ‘ छे, छे, सुंदरच आहेत’. हे शब्द तोंडून बाहेर पडल्यावर वासवदत्तेच्या लक्षात येतं की आपण भावनेच्या भरात मोठी चूक केली, कारण विवाहित स्त्रीयांना परपुरुषदर्शन वर्ज्य. मग ‘उज्जयिनीतली सारीच माणसं तसं म्हणतात, म्हणून मला माहित’ असं सांगून सारवासारव करते.

इतक्यात पद्मावतीची दाई रंगमंचावर प्रवेश करते. ती आलेली असते एक आनंदाची बातमी घेऊन- पद्मावतीचा साखरपुडा झाल्याची- तोही उदयनाशी! हे ऐकून वासवदत्ता पहिला प्रश्न विचारते तो उदयनाच्या खुशालीबद्दल. त्याचं कुशल आहे हे कळल्यावर मात्र ती ‘अरे देवा हे काय झालं!’ असं म्हणून जाते. मग पुन्हा स्पष्टीकरणं देणं आलं. ‘नुकतीच एक पत्नी गेल्यावर लगेच दुसरं लग्न ते करतील असं वाटलं नव्हतं’ असं म्हणून आपल्या दु:खाला वाट करून देते. पण उदयनाने वासवदत्तेला मागणी घातली नव्हती, ऊलट दर्शकाने स्वत:च आपल्या बहिणीसाठी उदयनाला मागणी घातली हे कळल्यावर तिला थोडंसं बरं वाटतं. म्हणजे उदयनाचं वासवदत्तेवरचं प्रेम अगदीच काही आटलं नसावं!

मग त्याच दिवशी शुभ नक्षत्र असल्याने ‘शुभमंगल’ करायचं ठरतं आणि पडदा पडतो.

तिसरा अंक

तिथे महालात राजकन्येच्या विवाहाचा जंगी उत्सव चालू आहे, दास्यांपासून राजापर्यंत सगळे खूश आहेत, पण वासवदत्ता मात्र एकाकी कोपऱ्यात बसून दु:ख करते आहे. ज्याच्या भल्यासाठी तिने हे विरहाचं दु:ख स्वत:च्या हातांनी स्वत:वर ओढवून घेतलं तोच आता तिला परका झाला. आता हा जीव सांभाळून काय करायचं! पण प्राण काही जात नाही, उदयनाच्या दर्शनाच्या आशेत अडकला आहे.

इतक्यात एक दासी तिला शोधत शोधत येते. ती सांगते की वासवदत्तेने पद्मावतीच्या विवाहाची माला गुंफावी अशी खुद्द पद्मावतीची इच्छा आहे. वासवदत्तेला आपलं दैवच आपल्या विरुद्ध गेलं आहे असं वाटू लागतं.

माला गुंफताना एकीकडे ती उदयनाची चौकशी करू लागते, ते ठीक आहेत ना, दिसायला कसे आहेत असे प्रश्न विचारते. पण लगेच आवरतं घेते कारण असे प्रश्न विचारणं म्हणजे परपुरुषाबद्दल कुतुहल दाखवणं होतं ना! मग ती मालेत गुंफायची एकेक वनस्पती हातात घेऊन ‘ही कोणती’ असं दासीला विचारते. त्यातल्या एका वनस्पतीचं नाव असतं ‘अविधवाकरण’ – म्हणजे जिच्यामुळे स्त्रीला वैधव्य न येता तिचं सौभाग्य टिकून राहतं ती. वासवदत्ता लगेच भरपूर अविधवाकरण घेऊन मालेत गुंफते. पुढची वनस्पती असते ‘सपत्नीमर्दन’ म्हणजे सवतीचा काटा काढणारी. त्यावर वासवदत्ता म्हणते ‘ही वनस्पती गुंफून काय उपयोग? पद्मावतीची सवत तर या जगात नाही ना’

माला गुंफून झाल्यावर दासी लगबगीने मंडपाकडे निघते आणि वासवदत्ता सोहळ्यापासून दूर!

पडदा पडतो

असे एकामागून एक नाट्यपूर्ण प्रसंग भास आपल्या अंकमालेत गुंफतो. खरं म्हणजे हे २ अंक खूपच छोटे आहेत. शिवाय या अंकांतून ज्या घटनेबद्दल माहिती मिळते- म्हणजे उदयन- पद्मावती यांचं लग्न, ते प्रत्यक्षात रंगमंचावर घडतच नाही. अशावेळी इतर नाटककार अंकाऐवजी एखादा प्रसंग योजून त्यात बिनमहत्त्वाच्या पात्रांकरवी (उदा.- दासी, शिपाई इ.) रंगमंचावर ज्या घटना दाखवायच्या नाहीत पण त्यांची थोडक्यात माहिती करून द्यायची आहे त्या घटना त्या पात्रांच्या संवादांतून प्रेक्षकांना कळवतात. पण भासाने मात्र इथे तसं केलेलं नाही. कारण उघड आहे. त्याच्या नाटकाची नायिका आहे वासवदत्ता आणि तिच्या मनातली वेगवेगळी आंदोलनं त्याला टिपायची आहेत. त्यामुळे त्याने या महत्त्वाच्या घटना पडद्याआड ठेवल्या आणि वासवदत्तेच्या स्वगत/ प्रकट संवादांतून तिच्या मनोवस्थेचं खूप सुंदर चित्रण केलं आहे. उदयन आता परका झाला याचं तिला दु:ख वाटतंय खरं, पण तिने त्याचा स्वीकार केला आहे. ही प्रक्रिया इतकी सहज नाही. ती आधी स्वत:ला सगळ्यांपासून तोडते. दूर जाऊन एकटीच बसते. दैवगती तिला एकटं सोडत नाही. नेमकं पद्मावतीची विवाहमाला बनवण्याचं कामच तिच्यावर सोपवण्यात येतं. ती मनावर दगड ठेवून ते काम सुद्धा पार पाडते. तिच्या मनात एकदाही पद्मावतीविषयी रागाची भावना निर्माण होत नाही. त्या दोघीचं आयुष्य आता समांतर चालणार आहे, तेव्हा दोघींसाठी योग्य होईल अशा तऱ्हेने ती विवाहमाला गुंफते. पण यामुळे तिचं दु:ख काही थांबत नसलं तरी त्यात विखारीपणा नक्कीच येत नाही. वासवदत्तेच्या मनोव्यापारातले हे टप्पे भासाने अचूक पकडले आहेत.

ता.क.- आज योगायोगाने मी या ब्लॉगवरचे जुने पोस्ट्स वाचत होते आणि लक्षात आलं की आजच या ब्लॉगला सुरू करून एक वर्ष झालं. ब्लॉगवर लिहून आणि इतक्या लोकांना हा ब्लॉग वाचताना पाहून, त्याचे प्रतिसाद वाचून छान वाटलं. अशीच ब्लॉगला भेट देत रहा :)

तपोवनाचा शांत परिसर. त्याच्या मधोमध उभ्या २ व्यक्ती- संन्यासाचा वेश धारण केलेला एक पुरुष आणि त्याच्यासोबत अवंती नगरीतल्या स्त्रियांसारखी वेषभूषा केलेली एक स्त्री. या दोन व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून खुद्द यौगंधरायण आणि वासवदत्ता आहेत. वेषांतर करून एका तपोवनात आले आहेत.

इतक्यात कुठूनतरी आरडाओरडा ऐकू येतो- ‘बाजूला व्हा, दूर हटा’. इथूनच तुम्हाला भासाचं एक वेगळं वैशिष्ट्य दिसून येईल. ते म्हणजे त्याने त्याच्या पात्रांच्या मनोव्यापारांवर व त्यातून उद्भवणाऱ्या प्रतिक्रियांवर भर देणे. इथेही गोष्ट तशी साधीशीच आहे. आश्रमातल्या तपस्वीजनांवर काही लोक दमदाटी करत आहेत. पण याला नाटकातली वेगवेगळी पात्रे कशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात पहा.

यौगंधरायण हा एक प्रजासेवक, एक क्षत्रिय, प्रजेचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य मानणारा. त्याला ते दमदाटी करणारे लोक थोड्याशा सत्तेने मुजोर झालेले, धर्मा-अधर्मात फरक न करणारे वाटतात. कारण फळं, वल्कलं, गवताची झोपडी एवढ्याच किमान गरजा असणाऱ्या निरुपद्रवी तपस्वीजनांना त्रास देणे हा अधर्म आहे असं त्याचं म्हणणं.

वासवदत्ता मात्र लहानपणापासून लाडात वाढलेली राजकन्या. २-३ सेविका सतत तिच्या मागेपुढे करत असणार. ती रस्त्यावरून अंबारीतून जाताना सगळे प्रजाजन लवून तिला नमस्कार करत असणार. अशा राजकन्येला आपल्याला कुणी सर्वसाधारण स्त्री म्हणून बाजूला लोटलेलं कसं चालेल? तिला हा स्वत:चा अपमान वाटतो आणि इतर कोणत्याही वेदनेपेक्षा भयंकर वाटतो. तेव्हा यौंगधरायण ‘हाही काळ जाईल, सुखाचे दिवस येतील. आपण पुन्हा अशाच अंबारीत विराजमान होऊन स्वत:च्या राज्यात परत जाल’ अशा शब्दांनी तिचं सांत्वन करतो.

इतक्यात एक कांचुकीय (राजस्त्रीयांचा सेवक) येऊन दमदाटी करणाऱ्या त्या लोकांना थांबवतो. तपस्वीजनांना असा उपद्रव दिल्याने त्यांच्या राजाच्या नावाला कलंक लागेल असं तो म्हणतो. एखाद्या राजसेवकाला आपल्या राजाच्या कीर्तीची काळजी असणारच. यौगंधरायण त्याला ‘हा सगळा काय प्रकार चाललाय’ असं विचारतो. तेव्हा कांचुकीयाकडून आपल्याला कळतं, की तो मगधराजा- ‘दर्शक’ याचा सेवक. त्याच्या मातोश्री म्हणजे मगधदेशाच्या राजमाता ‘महादेवी’ या आश्रमात राहतात. त्यांना भेटायलाच दर्शकाची बहिण ‘पद्मावती’ तपोवनात आली आहे. तिच्या सेवकांनी दमदाटी करून खराब केलेली तिची ‘इमेज’ सुधारण्यासाठी तो लगेच, ‘आमच्या राजकुमारी फार धर्मप्रिय आहेत, त्यांच्यामुळे आपल्या धर्मकार्यात बाधा यावी अशी त्यांची मुळीच इच्छा नाही.’ अशा छापाची सारवासारव करतो.

इतक्यात पद्मावती रंगमंचावर प्रवेश करते. आधीच ती राजकन्या आहे हे कळल्यावरच वासवदत्तेला आपली नातलग भेटल्यासारखा आनंद झालेला असतो. मग पद्मावतीचं देखणं, उच्चकुलीन रूप, नम्र आणि गोड वाणी पाहून ती वासवदत्तेला अधिकच आवडू लागते. त्यातच वासवदत्तेच्या भावासाठी पद्मावतीला मागणी घातली गेली आहे हे तिच्या कानावर पडतं. आणि अशी कुलीन, देखणी, नम्र राजकन्या आपली वहिनी होणार या कल्पनेने आनंदून जाते. पद्मावतीविषयी तिला अधिकच प्रेम वाटू लागतं.

यौंगधरायण मात्र हाडाचा राजकारणी. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. उदयन राजाबद्दल राजज्योतिषांनी केलेलं भाकित त्याला आठवतं. त्या भाकिताप्रमाणे या मगध देशाची राजकन्या म्हणजे पद्मावती हिच्याशी उदयनाचं लग्न होणार असतं. हे आठवून आपल्या राजाची (दुसरी) पत्नी म्हणून तिच्याविषयी त्याला आपुलकी आणि आदर वाटू लागतो.

अशातच आपल्या सेवकांनी केलेल्या दमदाटीची नुकसानभरपाई म्हणून की काय माहित नाही, पण पद्मावती ‘प्रत्येकाने त्याला जे हवे ते मागून घ्यावे, त्याची इच्छा पूर्ण केली जाईल’ असं जाहिर करते. ते ऐकून यौगंधरायणाच्या डोक्यातली चक्रं वेगाने फिरू लागतात. काय करायचं ते ठरल्यावर तो पद्मावतीला एक विनंती करतो. तो म्हणतो,- ‘ही (म्हणजे अवंतिकेच्या वेषातली वासवदत्ता) माझी बहिण. हिचा पती बाहेरगावी गेला आहे आणि तिच्या चारित्र्यरक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. पण मी हा असा भणंग संन्यासी. तिची काळजी कशी बरं घेऊ शकणार. आपण तर चतुर आणि धर्माचरणी आहात. आपण जर काही दिवस हिचा सांभाळ केलात, तर ती व तिचं चारित्र्य खचितच सुरक्षित राहिल’.

ही विनंती मान्य करणं फारच जोखमीचं असलं तरी दिलेला शब्द पाळायचा म्हणून पद्मावती ही जोखीम पत्करते आणि वासवदत्तेची रवानगी पद्मावतीच्या सखीपरिवरात होते. ही विनंती करताना यौगंधरायण वासवदत्तेला एक अक्षरानेही काही विचारत नाही किंवा त्याच्या कृतीचं स्पष्टीकरणही देत नाही. पण त्याच्यावरच्या गाढ विश्वासाने वासवदत्ता जे घडेल त्याचा निमूट स्वीकार करत असते.

पण या विनंतीमागे यौगंधरायणाचा नक्की हेतू काय? वासवदत्तेची जबाबदारी नाकारून तिला वाऱ्यावर सोडून देणं? नाही. त्याचा राजज्योतिषांवर पक्का विश्वास असतो. या पद्मावतीचंच पुढे उदयनाशी लग्न होणार हे तो गृहित धरून चाललेला असतो. या पद्मावतीच्या सखीपरिवरातच वासवदत्ता राहिली, तर पुढे उदयन- वासवदत्ता यांच्या पुनर्भेटीच्या वेळी वासवदत्तेच्या शुद्ध चारित्र्याची ग्वाही पद्मावती स्वत: देईल. शिवाय आता वासवदत्ता त्याच्यासोबत नसल्याने त्याला पुन्हा एकदा त्याच्या योजनेतल्या इतर सोबत्यांशी संपर्क साधून उदयनाला अप्रत्यक्षपणे राजकारणात मदत करता येईल.

नाटक सुरू झाल्यापासून ‘हे सगळं चाललंय काय? वासवदत्ता आणि यौगंधरायण वेषांतर करून तपोवनात का आलेत?’ असा प्रश्न आपल्याला पडलेला असतो. त्याचं उत्तर आपल्याला पुढच्या प्रसंगात मिळतं. एक ब्रह्मचारी रंगमंचावर प्रवेश करतो. प्रवासामुळे थकून जाऊन थोडी विश्रांती घ्यायच्या उद्देशाने तो तपोवनात येतो. त्याची विचारपूस करताना सर्वांना समजतं की हा ब्रह्मचारी लावाणक नावाच्या गावी शिक्षण घेण्यसाठी गेला होता. तो आता शिक्षण अर्धवट टाकून मगधदेशात चालला आहे. त्याचं कारण विचारलं असता त्याच्या गावावर एक संकट कोसळलं असल्याचं तो सांगतो. त्या गावात त्यांचा राजा उदयन त्याची राणी वासवदत्ता हिच्यासोबत रहात होता. तो शिकारीसाठी गेला असताना गावात आग लागून त्यात वासवदत्ता होरपळून गेली व तिला वाचवण्यासाठी गेलेला अमात्य यौगंधरायणही जळून खाक झाला. राजाच्या प्रियजनांचा मृत्यु म्हणजे मोठं संकटच!

आता आपल्या डोक्यात प्रकाश पडतो, की उदयनाने पुन्हा राज्यकारभारात लक्ष घालावं म्हणून वासवदत्ताच्या मृत्युची आवई उठवली जाते. आणि अज्ञातवासादरम्यान तिच्या रक्षणार्थ कुणी विश्वासू व्यक्ती तिच्यासोबत असावी यासाठी यौगंधरायणानेही तिच्यासोबत जावं म्हणून तोही त्यात गेल्याचं सांगितलं जातं.

ब्रह्मचाऱ्याच्या तोंडून त्या प्रसंगाबद्दल ऐकताना वासवदत्तेला पुन्हा उदयनाच्या विरहाचं दु:ख जाणवू लागतं. इथे ब्रह्मचारी पुढची – वासवदत्ता आणि यौगंधरायणाला माहित नसलेली हकीगत सांगू लागतो- त्या दोघांच्या मृत्युचं वृत्त ऐकून उदयन दु:खाने वेडापिसा होतो. त्याच आगीत स्वत:चे प्राण देण्यासाठी उडी मारण्याचा प्रयत्न करतो. पण इतर मंत्री नानाप्रकारे त्याला आगीपासून दूर ठेवतात. मधेच त्याला वासवदत्तेचे अर्धवट जळलेले दागिने दिसतात, ते हृदयाशी कवटाळून तो जमिनीवर गडबडा लोळू लागतो आणि अखेर त्याची शुद्ध हरपते. शुद्धीवर आल्यानंतरही तो वासवदत्तेला ‘अगं प्रिये, अगं प्रियशिष्ये’ अशा हाका मारत आक्रोश करत राहतो. ‘इथे मी तिच्यासोबत हसलो, इथे बसून तिच्याशी बोललो’ असा शोक तो करत असतो. त्याचा विलाप पाहून ब्रह्मचारी म्हणतो- ‘धन्या सा स्त्री यां तथा वेत्ति भर्ता, भर्तृस्नेहात्सा हि दग्धाप्यदग्धा।’ म्हणजेच ज्या स्त्रीसाठी तिच्या पतीने असा शोक केला ती धन्य होय. ती प्रत्यक्षात जरी जळून मेली असली तरीही तिच्या पतीच्या हृदयातली तिची प्रतिमा कधीच नष्ट होणार नाही. म्हणूनच ती ‘दग्धा’ असली तरीही ‘अदग्धा’च!

ही हकीगत ऐकल्यावर उदयनाला आपल्यामुळे किती दु:ख झालं हे पाहून वासवदत्तेला आणखीनच वाईट वाटतं. तो बेशुद्ध पडल्याचं ऐकून तर अधिकच. पण त्याचं आपल्यावर इतकं प्रेम आहे हे पाहून या दु:खातही थोडासा दिलासा मिळतोच. वृत्तांतकथन चालू असताना वासवदत्तेच्या तोंडी असलेल्या छोट्याशा संवादांतून, तिच्या रडण्यातून, भास या संमिश्र भावनांचं छान चित्रण करतो. इथे पद्मावतीला उदयनाची ही संवेदनशीलता, वासवदत्तेवरचं प्रेम पाहून त्याच्याबद्दल आपुलकी, काळजी वाटायला लागते.

या कथनाचा प्रत्येक पात्रावर वेगवेगळा परिणाम होतो. नंतर प्रत्येकजण आपापल्या नगरात / घरात परत जातो आणि पहिला अंक संपतो.

या अंकातली सर्वात मोठी irony म्हणजे त्यात ज्या २ व्यक्तींच्या मृत्युचं वर्णन केलं गेलं आहे त्या दोन व्यक्ती रंगमंचावरच उपस्थित आहेत आणि आपल्याच कानांनी आपल्याच खोट्या मृत्युचं वर्णन ऐकतायत. या प्रसंगातच किती नाट्यपूर्णता आहे!

पुढच्या अंकात वासवदत्ता पद्मावतीच्या राजमहालात गेल्यावर कथेला एक वेगळंच पण काहीसं अपेक्षित वळण मिळतं. तो कथाभाग पुढल्या भागात!

भासाने उदयनकथेवर २ नाटकं लिहिली. त्यापैकी पहिलं ‘प्रतिज्ञायौगंधरायण’ आणि दुसरं ‘स्वप्नवासवदत्तम’. ‘प्रतिज्ञा….’ जिथे संपतं त्याच्या काही काळानंतर ‘स्वप्न….’ चं कथानक उलगडतं. त्यामुळे ‘प्रतिज्ञा….’ ची थोडी ओळख करून देणं गरजेचं आहे.

उदयन हा एक नवतरुण राजा आणि त्याला राज्यकारभारात सल्ला देऊन मदत करणारा त्याचा तीक्ष्णबुद्धी, अत्यंत विश्वासू असा अमात्य- यौगंधरायण यांच्याभोवती अख्खं कथानक फिरतं. आपला नायक- उदयन म्हणजे मोठा शौकिन राजा बरं का! त्याच्या वीणावादनातल्या प्रावीण्याची कीर्ती सगळीकडे पसरलेली. इतकंच नव्हे, तर त्याच्या लाडक्या ‘घोषवती’ वीणेचं वादन करून रानटी हत्तींना भुलवायचं आणि ते जवळ आले की त्यांना पकडायचं हा त्याचा छंद. या कामातही तो फार कुशल होता. पण त्याच्या याच गुणांनी त्याचा घात केला. अशाच हत्तींच्या शिकारीवर उदयन निघालेला असताना, त्याचा शत्रूराजा प्रद्योत महासेन याने कपटाने खोट्या हत्तीत सैनिक लपवून पाठवले आणि उदयन रानात एकटा असताना त्याला पकडून आणून आपल्या कैदेत ठेवलं.

ही बातमी यौगंधरायणाला समजल्यावर त्याने उदयनाला कैदेतून सोडवून आणण्याचा चंग बांधला. वेषांतरं, क्लृप्त्या अशा मार्गांंची आखणी सुरू केली. पण इथे कैदेत उदयन अगदीच काही दु:खी वगैरे नव्हता. कारण, तिथे त्याला एक वेगळीच शिक्षा देण्यात आली होती. आणि ती म्हणजे प्रद्योत महासेनाची अत्यंत देखणी आणि स्वभावाने सुंदर अशी कन्या वासवदत्ता हिला वीणावादन शिकवणं. झालं, दोघांचं एकमेकांवर प्रेम जडलं आणि उदयनासोबत वासवदत्तेलाही पळवून आणण्याची जबाबदारी यौगंधरायणावर पडली.

त्यानुसार नवीन योजना आखल्या गेल्या आणि काही अपयशांनंतर उदयन वासवदत्तेला पळवून आपल्या राज्यात घेऊन आला. या सगळ्या भानगडीत यौगंधरायण मात्र पकडला गेला, पण उदयनाच्या पायी वाहिलेल्या त्याच्या निष्ठेचं, राजकारणातल्या कौशल्याचं आणि बुद्धीचातुर्याचं कौतुक करून सन्मानाने त्याला परत पाठवण्यात आलं आणि सगळीकडे आनंदी आनंद झाला. इथे हे नाटक संपतं

तांत्रिकदृष्ट्या, ज्याला ‘फलप्राप्ती’ होते तो नाटकाचा नायक मानला जातो. त्या दृष्टीने उदयन हा या नाटकाचा नायक असला पाहिजे. कारण त्याला राज्य आणि वासवदत्ता अशी दुहेरी फलप्राप्ती होते. पण मजा म्हणजे उदयनच काय वासवदत्तासुद्धा अख्खं नाटकभर एकदाही रंगमंचावर अवतरत नाहीत. फक्त त्यांच्याबद्दलच्या बातम्याच आपल्याला कळतात आणि रंगमंचावर जे नाट्य घडतं ते म्हणजे यौगंधरायणाच्या क्लृप्त्या, त्यांना आलेलं अपयश, अखेर यश, मग त्याला झालेली अटक आणि मग सुटका अशा घडामोडी. त्या अर्थाने हे सगळं घडवून आणणारा यौगंधरायण हा या नाटकाचा नायक म्हणायला हवा.

त्यानंतर उदयन- वासवदत्ता यांचं लग्न होतं. ते सुखाने नांदू लागतात. पण या सुखातच उदयन इतका गुरफटून जातो, की राज्यकारभाराकडे त्याचं दूर्लक्ष होतं. जवळजवळ सगळंच राज शत्रूच्या घशात जातं. उदयनाला शुद्धीवर आणण्याची गरज निर्माण होते. त्यासाठी यौगंधरायण वासवदत्तेला विश्वासात घेऊन एक वेगळीच योजना आखतो. आणि त्यातून निर्माण होतं पुढचं नाट्य- ‘स्वप्नवासवदत्तम’!

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता स्वप्नवासवदत्तम या नाटकाचं अंकवार कथानक आणि त्यातली मला लक्षात आलेली आणि आवडलेली काही सौंदर्यस्थळं पुढच्या लेखापासून…

भास

कित्येक दिवसांपासून मला माझ्या ‘स्वप्नवासवदत्तम’ या आवडत्या नाटकाबद्दल लिहायचं होतं. परवाच परीक्षा संपली आणि आज मुहूर्त सापडला. :)

संस्कृत नाटकं म्हटली की तोंडात पहिलं नाव येतं ते कालिदासाचं. एक कालिदास सोडता इतर संस्कृत नाटककारांची नावे फारच कमी जणांना माहित असतात. कदाचित संगीत नाटकं पाहिलेल्या पिढीला भास, शूद्रक, विशाखदत्त वगैरे नावं माहित असतील.

मी स्वत: या सगळ्यांची नाटकं वाचलेली नाहीत. मी कालिदासाची शाकुंतल, विक्रमोर्वशीयम, मालविकाग्निमित्रम; विशाखदत्ताचं मुद्राराक्षस आणि भासाची प्रतिज्ञायौगन्धरायण, चारुदत्त, कर्णभार, स्वप्नवासवदत्तम अशी नाटकं वाचली किंवा पाहिली आहेत. एक वाचक म्हणून मला सर्वाधिक आवडतो तो ‘भास’. कालिदासाच्या उपमांबद्दल मी पामर काय बोलणार? त्या अप्रतिम आणि चपखल असतात. पण तरीही नाट्य म्हणून कालिदासाच्या नाटकाचा माझ्यावर पडणारा एकत्रित परिणाम काही खास नाही. त्याची नाटकं मला आजकालच्या दैनंदिन मालिकांसारखी गोड गोड आणि घासून घासून गुळगुळीत केलेली वाटतात. अर्थात हे माझं वैयक्तिक मत. कदाचित मलाच कालिदासाच्या नाट्यप्रतिभेची ओळख पटली नसेल. ती शक्यता बरीच जास्त आहे. पण एक वाचक म्हणून मला कालिदासाची काव्यं भयंकर आवडतात. त्यामानाने नाटकं नाही.

याऊलट ‘भास’. त्याच्या नाटकात ‘वास्तवा’चं दर्शन घडतं असं म्हणणं कदाचित पूर्णतया योग्य होणार नाही, पण एखाद्या घटनेवर त्याच्या एकेका पात्राच्या मनातली जी आंदोलनं त्याने रेखाटलेली असतात ती खचितच वास्तविक असतात, खरी वाटतात. त्याच्या नाटकांतलं ‘नाट्य’ दुहेरी असतं. एक पात्रांच्या क्रियाप्रतिक्रियांतून घडणारं आणि ते घडायला कारणीभूत होणारं दुसरं, पात्रांच्या मनात घडणारं नाट्य!

भास त्याचं कुठलंही पात्र पूर्णत: काळ्या रंगात रंगवत नाही. त्याच्या प्रत्येक खलनायकी पात्रात कमी अधिक प्रमाणात दिसणारी grey ची छटा हे भासाचं दुसरं वैशिष्ट्य! त्याच्या कैकेयीच्या घरभेदी वागण्यामागेही एक तर्कसंगत कारण असतं, त्याचा कंस वाईट वागत असतो तो नियतीमुळे.

त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने त्याच्या नाटकांत केलेले वेगवेगळे प्रयोग. भास असा एकमेव संस्कृत नाटककार आहे, ज्याने शोकांतिका लिहिल्या. त्याने नाट्यधाराही लिहिल्या. त्याने पंचरात्र हे एक नाटक लिहून पूर्ण महाभारतच बदलून टाकलं. अशी कित्येक वैशिष्ट्ये सांगता येतील. कित्येक वैशिष्ट्यं अजून लक्षात यायची असतील.

इतर नाटककारांप्रमाणेच भासाचीही वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. पण त्याच्या नाटकांतील काही संदर्भांवरून तो इसवीसन पूर्व ५व्या शतकात होऊन गेला असे मानले जाते. सध्या उपलब्ध असलेल्या संस्कृत नाटकांवरून संस्कृत नाट्यपरंपरेच्या सुरुवातीलाच भासाचं स्थान आहे हे लक्षात येतं. त्याने एकूण १३ नाटकं लिहिली असं मानलं जातं. त्याच्या या १३ नाटकांना ‘भासनाटकचक्र’ म्हटलं जातं. त्यांपैकी २ नाटकं रामायणावर , ६ नाटकं महाभारतावर, १ हरिवंशावर, २ लोककथांवर आधारित आहेत. आणि उरलेली २ नाटकं उदयनकथेवर आधारित आहेत.

स्वप्नवासवदत्तम ची माहिती पुढील लेखात…

फूल

फूल

 मैत्रिणीच्या बागेतलं जास्वंदाचं फूल

मात्स्यन्याय

मात्स्यन्याय 

 आमची पाठ फिरताच छोट्याला गिळंकृत करणारा आमच्या फिशटॆंकमधला मोठा मासा

फुलपाखरू

फुलपाखरू

या फोटो काढतानाची मजा म्हणजे, मी त्यासाठी माझा सेल सरसावत असताना ते फुलपाखरू उडून गेलं. तर मी त्याला दरडावलं, ए चाललास कुठे? मी तुझा फोटो काढतेय ना. चल परत बस बघू इकडे. आणि ते परत फुलांवर येऊन बसलं की हो!

कुत्र्याची पिल्लं

कुत्र्याची पिल्लं

आमच्या विश्वविद्यालयाच्या आवारात आडोशाला आलेली ही कुत्र्याची पिल्लं.

ही वाट दूर जाते

ही वाट दूर जाते

तिथल्याच एका रस्त्यावर झाडांनी तयार केलेला बोगदा

« Newer Posts - Older Posts »