Recap-
पद्मावतीला डोकेदुखीचा त्रास होत असल्याचं वृत्त समजताच उदयन आणि वासवदत्ता तिला भेटायला जातात. पद्मावती तिथे नसतेच व उदयन वासवदत्तेची भेट होते, पण एका वेगळ्याच प्रकारे- उदयन झोपी जातो व स्वप्नातल्या वासवदत्तेला प्रश्न विचारतो तेव्हा प्रत्यक्षातली वासवदत्ता त्याच्या समोर उभी राहून त्याला उत्तरं देते. निघताना त्याच्या हाताला स्पर्श करण्याचं निमित्त होतं व अर्धवट जागा झालेल्या उदयनाला वासवदत्ता जिवंत असल्याची खात्री पटते. इतक्यात उदयनाच्या शत्रुचा नायनाट होऊन उदयनाचे सर्व राज्य परत मिळाल्याची बातमी घेऊन कांचुकीय येतो. आता पुढे-
अंक सहावा-
यौगंधरायाच्या योजनेचा हेतू सफल झाल्यावर आता वासवदत्तेने आणखी काही काळ अज्ञातवासात राहण्यास काहीच प्रयोजन उरत नाही. सहाव्या अंकात उदयन-वासवदत्तेची पुनर्भेट भासाने रंगवली आहे.
राज्य परत मिळाल्यावर उदयनाने पद्मावतीसोबत आपला मुक्काम सासुरवाडीहून आपल्या स्वत:च्या राज्यात, स्वत:च्या महालात हलवला आहे. एक दिवस असंच महालातून फिरत असताना उदयनाच्या कानी वीणेचे सूर पडतात. ते सूर त्याच्या ‘घोषवती’ नामक वीणेचे असल्याचे ते लगेच ओळखतो. मग ती वीणा वाजवणाऱ्या माणसाला पाचारण करून ‘ही तुला कुठे मिळाली?’ वगैरे विचारण्यात येते. ती वीणा खरोखरीच ‘घोषवती’ असल्याचे सिद्ध होते. उदयनाला आपल्या पहिल्या प्रेमाची साक्षीदार अशी ती वीणा परत मिळाल्यावर आनंद तर होतोच परंतू त्यापाठोपाठ वासवदत्तेची आठवण होऊन त्याचा जीव कासावीस होतो. ‘घोषवती तर मिळाली, पण घोषवती जिची लाडकी होती, ती काही दृष्टीस पडत नाही’ असे म्हणून तो शोक करू लागतो.
इतक्यात वासवदत्तेच्या माहेराहून त्यांचा कांचुकीय वासवदत्तेची दाई- वसुंधरा हिच्यासोबत उदयनाला भेटायला येतो. तेव्हा पद्मावतीही ‘वासवदत्तेचे नातेवाईक ते माझे नातेवाईक’ असे म्हणत उदयनासोबत कांचुकीय व वसुंधरेला सामोरी जाते. उदयनाच्या मनाला मात्र एका वेगळ्याच भीतीने घेरलेले असते. तो पद्मावतीला म्हणतो- “त्यांच्या कन्येचे मी हरण केले, परंतू तिचे रक्षण मात्र करू शकलो नाही! आता ते काय म्हणतील बरे!”
परंतू कांचुकीयाच्या बोलण्यावरून महासेन (वासवदत्तेचे वडिल) उदयनावर चिडलेले नसल्याचे लक्षात येते. तो प्रथम राज्य परत मिळवल्याबद्दल उदयनाचं अभिनंदन करतो. पुढे वसुंधरा त्याला वासवदत्तेच्या आईचा- राणी अंगारवतीचा निरोप सांगते- “महासेन महाराजांना सुरुवातीपासूनच तुम्ही जावई म्हणून पसंत होतात, म्हणूनच खोट्या हत्तीचा बनाव रचून तुम्हाला आमच्या महाली आणले व वीणा शिकवण्याच्या निमित्ताने तुमची व वासवदत्तेची भेट घडवून आणली. तुम्हा दोघांचं लग्न लावण्याचा विचार सुरू असतानाच, तुमच्या उतावीळ स्वभावाला अनुसरून तुम्ही दोघं पळून गेलात. म्हणून त्यानंतर तुम्हा दोघांची हुबेहुब चित्रे बनवून घेऊन विवाहविधी उरकला. आता ती चित्रे तुम्हाला भेट देण्यासाठी आणली आहेत.”
वासवदत्ता दिसायला होती तरी कशी या कुतूहलाने पद्मावती तिचे चित्र पाहते. ते चित्र पाहून तिला आपली प्रोषितभर्तृका सखी आठवते. चित्रे खरेच हुबेहुब आहेत का हे पहायला ती उदयनाचे चित्र पाहते. चित्रे हुबेहुब असल्याची खात्री झाल्यावर ती उदयनाला आपल्या सखीबद्दल सांगते. परंतू ती स्त्री एका ब्राह्मणाची बहिण असल्याचे पद्मावतीकडून समजल्यावर उदयनाची आशा मावळते. या जगात एकसारख्या दिसणाऱ्या व्यक्ती असतात असे म्हणून तो स्वत:ची समजूत घालतो.
इतक्यात प्रतिहारी (म्हणजे दारावर उभी असणारी स्त्री संरक्षक) येते व दाराशी एक ब्राह्मण पद्मावतीकडे ठेव म्हणून सांभाळायला दिलेल्या आपल्या बहिणीला न्यायला आला आहे असे सांगते. तो ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणवेषातला यौंगधरायण काहीसा बिचकतच प्रवेश करतो. ‘मी एवढा कट केला खरा, आणि त्याला यश आलं हेही खरं पण आता उदयन महाराज मला काय म्हणतील?’ अशी चिंता त्याच्या मनाला लागून राहिलेली असते.
ब्राह्मणवेषातल्या यौंगधरायणाला उदयन पटकन ओळखत नाही, पण त्याचा आवाज मात्र ओळखीचा वाटतो. मग वासवदत्तेला बोलावलं जातं. हा ठेव परत करण्याचा व्यवहार साक्षीदारांच्या समक्ष करावा असा उदयनाचा आग्रह असतो. परंतू ठेव म्हणजे एक अवगुंठनातली स्त्री असल्याने व परस्त्रीकडे पाहू नये असा संकेत असल्याने तो वसुंधरेला साक्षीदाराचं काम करायला सांगतो. तेव्हा नीट पाहिल्यावर वसुंधरा वासवदत्तेला ओळखते.
लगेच यौगंधरायण आणि वासवदत्ता ‘महाराजांचा जयजयकार असो!’ असं म्हणत आपलं खरं रूप प्रकट करतात, यौगंधरायण राजाला नेमके काय व कसे झाले ते समजावून सांगतो. पद्मावती वा वासवदत्ता यांच्या मनात एकमेकींबद्दल प्रचंड आदर व प्रेम असल्याने त्या सवत म्हणून एकमेकींचा स्वीकार करतात.
आणि शेवटी भरतवाक्याने नाटकाचा शेवट होतो.
Wah farach chaan. Majhe aajoba mala ashya sanskrit natakanbaddal sangayache, tyachya kathahi goshta mhanun sangayache. Aaj punha tyachi aathavan jhali.
) Baki, lekhanshaili suddhaa chaan aahe tumachi. keep writing.
-Vidya
नाट्यकथा आवडली. लहानपणी नी. शं. नवरे यांची पुस्तके वाचली होती त्याची आठवण झाली.
संस्कृताचे ज्ञान आतापर्यंत सातशिळे झाल्यामुळे मूळ संहिता वाचणे या जन्मी दुर्घट दिसते आहे.
तेव्हा असेच आणखी लिहावे, आम्ही निदान ताकावर तहान भागवू.
- दिगम्भा
Hi,
Khup chhan aahe katha…
Asech bakichyahi sanskrut natakanache rasgrahan karayala avadel mala….
Keep it up !!!!!
-Arati