कित्येक दिवसांपासून मला माझ्या ‘स्वप्नवासवदत्तम’ या आवडत्या नाटकाबद्दल लिहायचं होतं. परवाच परीक्षा संपली आणि आज मुहूर्त सापडला.
संस्कृत नाटकं म्हटली की तोंडात पहिलं नाव येतं ते कालिदासाचं. एक कालिदास सोडता इतर संस्कृत नाटककारांची नावे फारच कमी जणांना माहित असतात. कदाचित संगीत नाटकं पाहिलेल्या पिढीला भास, शूद्रक, विशाखदत्त वगैरे नावं माहित असतील.
मी स्वत: या सगळ्यांची नाटकं वाचलेली नाहीत. मी कालिदासाची शाकुंतल, विक्रमोर्वशीयम, मालविकाग्निमित्रम; विशाखदत्ताचं मुद्राराक्षस आणि भासाची प्रतिज्ञायौगन्धरायण, चारुदत्त, कर्णभार, स्वप्नवासवदत्तम अशी नाटकं वाचली किंवा पाहिली आहेत. एक वाचक म्हणून मला सर्वाधिक आवडतो तो ‘भास’. कालिदासाच्या उपमांबद्दल मी पामर काय बोलणार? त्या अप्रतिम आणि चपखल असतात. पण तरीही नाट्य म्हणून कालिदासाच्या नाटकाचा माझ्यावर पडणारा एकत्रित परिणाम काही खास नाही. त्याची नाटकं मला आजकालच्या दैनंदिन मालिकांसारखी गोड गोड आणि घासून घासून गुळगुळीत केलेली वाटतात. अर्थात हे माझं वैयक्तिक मत. कदाचित मलाच कालिदासाच्या नाट्यप्रतिभेची ओळख पटली नसेल. ती शक्यता बरीच जास्त आहे. पण एक वाचक म्हणून मला कालिदासाची काव्यं भयंकर आवडतात. त्यामानाने नाटकं नाही.
याऊलट ‘भास’. त्याच्या नाटकात ‘वास्तवा’चं दर्शन घडतं असं म्हणणं कदाचित पूर्णतया योग्य होणार नाही, पण एखाद्या घटनेवर त्याच्या एकेका पात्राच्या मनातली जी आंदोलनं त्याने रेखाटलेली असतात ती खचितच वास्तविक असतात, खरी वाटतात. त्याच्या नाटकांतलं ‘नाट्य’ दुहेरी असतं. एक पात्रांच्या क्रियाप्रतिक्रियांतून घडणारं आणि ते घडायला कारणीभूत होणारं दुसरं, पात्रांच्या मनात घडणारं नाट्य!
भास त्याचं कुठलंही पात्र पूर्णत: काळ्या रंगात रंगवत नाही. त्याच्या प्रत्येक खलनायकी पात्रात कमी अधिक प्रमाणात दिसणारी grey ची छटा हे भासाचं दुसरं वैशिष्ट्य! त्याच्या कैकेयीच्या घरभेदी वागण्यामागेही एक तर्कसंगत कारण असतं, त्याचा कंस वाईट वागत असतो तो नियतीमुळे.
त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने त्याच्या नाटकांत केलेले वेगवेगळे प्रयोग. भास असा एकमेव संस्कृत नाटककार आहे, ज्याने शोकांतिका लिहिल्या. त्याने नाट्यधाराही लिहिल्या. त्याने पंचरात्र हे एक नाटक लिहून पूर्ण महाभारतच बदलून टाकलं. अशी कित्येक वैशिष्ट्ये सांगता येतील. कित्येक वैशिष्ट्यं अजून लक्षात यायची असतील.
इतर नाटककारांप्रमाणेच भासाचीही वैयक्तिक माहिती उपलब्ध नाही. पण त्याच्या नाटकांतील काही संदर्भांवरून तो इसवीसन पूर्व ५व्या शतकात होऊन गेला असे मानले जाते. सध्या उपलब्ध असलेल्या संस्कृत नाटकांवरून संस्कृत नाट्यपरंपरेच्या सुरुवातीलाच भासाचं स्थान आहे हे लक्षात येतं. त्याने एकूण १३ नाटकं लिहिली असं मानलं जातं. त्याच्या या १३ नाटकांना ‘भासनाटकचक्र’ म्हटलं जातं. त्यांपैकी २ नाटकं रामायणावर , ६ नाटकं महाभारतावर, १ हरिवंशावर, २ लोककथांवर आधारित आहेत. आणि उरलेली २ नाटकं उदयनकथेवर आधारित आहेत.
स्वप्नवासवदत्तम ची माहिती पुढील लेखात…
Khupch chhan lihila aahe! Sanskritshi baryach diwasani sambandh aala aani tehi Swapnavasavdatt.. khasach. Lavkar pudhcha bhag taak.
वा फार सुरेख विषय आपण निवडला आहेत. भास हा माझ्या ही आवडीचा नाटककार. आनंद साधलेनी फार सुंदर मराठीत भाषांतर केलेली कालीदास, भास, ह्याची पुस्तकांचे मी पारायणे केली आहेत.
कुमार संभव पण फार सुरेख कादंबरी आहे.
पुढील लेखाची आतुरतेने वाट पहात आहे
त्याची नाटकं मला आजकालच्या दैनंदिन मालिकांसारखी गोड गोड आणि घासून घासून गुळगुळीत केलेली वाटतात – correct, karan tyanchya original idea itakya vela lokanni vaparalya aahet, ki tumhi aamhi ti original nataka vachayachya aadhi, itaranni keleli tyanchi copy kityek vela vachaleli aahe.
Tumhi he je kalidasanchya natakanbadhal mhantlat te mala june natakkar jase Vasant Kanitkar, etc. hyanchya junya nataknabaddhalahi vatte…..original idea ani ti apalyaparynataa pochanyaparyanta gelela kaalavadhi he tyacha karan asava.
thx for comments, sneha, harekrishnaji, koham!