||श्री||
आजपासून वासरीलेखनाचा श्रीगणेशा करते आहे. यात साधारणपणे मला आवडलेली संस्कृत सुभाषिते असतील व त्याखाली मी त्यांचा माझ्या अल्पमतीप्रमाणे लावलेला अर्थ. (त्यामुळे शुद्धलेखानात किंवा अर्थ लावण्यात काही चुका झाल्या तर चु.भु.दे. घे.) कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात मंगलाचरणाने करायची असते तर मी या वासरीची सुरुवात करते महाकवी कालिदासाच्या लेखणीतून उतरलेल्या रघुवंश या महाकाव्याच्या नांदीने!
वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये।
जगतः पितरौ वंदे पार्वतिपरमेश्वरौ॥
प्रत्येक महाकाव्य/नाटक/ग्रंथ मंगलाचरणाने सुरू करावा असा संस्कृत साहित्यात संकेत आहे. त्याला अनुसरून कालिदासाने ‘रघुवंश’ या महाकाव्याचा श्रीगणेशा या श्लोकाने केला. १९ सर्गांच्या या महाकाव्याला सुरुवात करताना कोणतेही विघ्न उद्भवू नये, म्हणून त्याने पार्वती व शंकराची आळवणी या श्लोकातून केली आहे. कालिदास म्हणतो, “शब्दाशिवाय अर्थ नाही आणि अर्थाशिवाय शब्द नाही. हे शब्द आणि अर्थ जसे एकमेकांशी तादात्म्य पावलेले आहेत, तसेच भगवान शंकर व देवी पार्वती, तुम्ही दोघेही एकमेकांशी तद्रुप झाला आहात. तेव्हा शब्द आणि अर्थ यांना जाणून घ्यायची इच्छा करणाऱ्या मला तुमचा आशीर्वाद लाभो.”
अर्थाला वगळा गतप्रभ झणी होतील शब्दांगणे,
शब्दांना वगळा विकेल कवडीमोलापरि हे जिणे!
अत्यंत सुंदर श्लोक आहे, जितके त्यात खोलात जाऊ तितके नवनवीन अर्थ समोर येतील. त्यावर बोलण्यासाठी ‘क्व मे अल्पविषया मति?’
लेखनासाठी शुभेच्छा. सुभाषिते आणि त्यांचा अर्थ वाचायला नक्कीच आवडेल.